प्रत्येक तालुक्यात संविधान भवन उभारणार – एकनाथ शिंदे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन

ठाणे : समता, बंधुता हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घरोघरी जावेत यासाठी प्रत्येक तालुक्यात राज्य सरकार संविधान भवन उभारणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी कोर्ट नाका येथिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४व्या जयंती दिनी पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले कि जगातील सर्व देशाच्या घटनांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्या देशाला दिली. या घटनेने जगण्याचा अधिकार दिला, त्यामुळेच एक आदिवासी महिला देशाची राष्ट्रपती झाली. सर्वसामान्य घरातील मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले. माझ्यासारखा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला. हे केवळ बाबासाहेब यांच्यामुळे शक्य झाले आहे. त्यांचे समतेचे विचार घरोघरी जावेत या उद्देशाने प्रत्येक तालुक्यात एक संविधान भवन उभारणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राज्य सरकार इंदु मिलच्या जागेवर बाबासाहेब यांचे भव्य स्मारक बनवत आहे. बाबासाहेब यांच्या विचाराचा एक अंश जरी मला मिळाला तरी माझे जीवन धन्य होईल, असे देखील उपमुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांचा नेहमी अपमान केला. आम्ही देशाच्या संविधानाप्रमाणे राज्यकारभार करत असून काही लोक लाल डायरी घेऊन फिरतात, असा टोला त्यांनी राहुल गांधी यांना लगावला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव संजय मोरे उपस्थित होते.