ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
मुर्शीदाबाद : लोकसभा निवडणुकीचे मतदान आजपासून सुरू झाले आहे. शुक्रवारी पहिल्या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये तीन मतदारसंघासाठी मतदान झाले. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीवर टीका केली. काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष भाजपाचे एजंट आहेत, त्यामुळे या मतदारसंघात इंडिया आघाडीकडून कोणताही पाठिंबा मिळत नाही, असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला.
मुर्शीदाबाद येथील जाहीर सभेत बोलत असताना बॅनर्जी म्हणाल्या की, मतदानापूर्व चाचण्यामध्ये भाजपाला अधिक जागा मिळतील असे सांगण्यात आले असले तरी भाजपा २०० च्या पुढे जाणार नाही. ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, “काही लोक बोलतात आम्ही इंडिया आघाडी आहोत म्हणून आम्हाला मतदान करा, मात्र या आघाडीत इंडिया नाही, ती आघाडी फक्त दिल्लीत आहे. काँग्रेस आणि सीपीआय (एम) यांची इंडिया आघाडी पश्चिम बंगालमध्ये नाही. इथे आमच्यासाठी ते भाजपा आहेत. त्यांना एक मत जाणं म्हणजे भाजपाला दोन मत जाणे. त्यामुळे त्यांना मत देऊ नका.” बॅनर्जी पुढे म्हणाल्या, आगामी काळात आम्ही विरोधी पक्षांच्या आघाडीचे नेतृत्व नक्कीच करू. पण पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) हे भाजपाचे एजंट आहेत. त्यामुळे त्यांना मी इथे पाठिंबा देणार नाही.