मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयुक्त ढोले यांचा सत्कार

भाईंदर : मीरा-भाईंदर शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आयुक्त दिलीप ढोले यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासन सक्रिय झालेले आहे. याच वेळी राजीव गांधी प्रशासकीय गतीमानता अभियान स्पर्धेत पुरस्कार पटकाविल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आयुक्त दिलीप ढोले यांचा सह्याद्री गेस्ट हाऊस येथे जाहिर सत्कार करण्यात आला आहे.

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान या स्पर्धा अंतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिकेने सेवा हमी कायद्याअंतर्गत ४८ विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने मीरा भाईंदर महानगरपालिकेला तृतीय क्रमांकाने मानांकित करुन सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२२ अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री. अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांच्या उपस्थितीत मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार करण्यात आला.

सन २०२१-२२ या वर्षापासून राज्यात तालुका, जिल्हा विभाग व राज्यस्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” चे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाच्या अनुषंगाने स्पर्धेचे प्रस्ताव सादर करणेसाठी पंतप्रधान पारितोषिक योजनेच्या धर्तीवर ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी राज्यातील सर्व महानगरपालिकांनी ऑनलाईन प्रस्ताव सादर केले होते. या अभियानातंर्गत राज्यस्तरावर प्राप्त प्रस्तावांची छाननी राज्यस्तरीय निवड समिती मार्फत करण्यात आली. सन २०२१-२०२२ करिता अंतिम पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यात आली असून मिरा भाईंदर महानगरपालिकेने सेवा हमी कायद्याअंतर्गत ४८ विविध प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्याने महानगरपालिकेला तृतीय क्रमांकाने मानांकित करून दिनांक २१ एप्रिल २०२२ रोजी सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे नागरी सेवा दिन कार्यक्रम २०२२ अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपायुक्त (मुख्यालय) मारुती गायकवाड व उपायुक्त (संगणक) संजय शिंदे उपस्थित होते.