* गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध नाहीत
* सर्व परवानग्या एक खिडकी योजनेतून
* शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून ब्रेक लागलेल्या दहीहंडी आणि गणेशोत्सवाला यंदा हिरवा कंदील मिळाला आहे. कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. यंदा गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाला कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
मागील दोन वर्षापासून गणेशोत्सवादरम्यान कोरोनाचे निर्बंध असल्याने राज्यात दहीहंडी आणि गणेशोत्सव साधेपणाने साजरे करण्यात आले आहेत. मात्र यावर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणेश मूर्तींच्या उंचीचे निर्बंध हटवण्यात आले असून उत्सवाच्या सर्व परवानग्या एक खिडकी पद्धतीने देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्यामुळे एक वेगळा उत्साह यावर्षी पाहायला मिळणार आहे. राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहेत. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा गणेशोत्सव 31ऑगस्ट ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत साजरा होणार आहे.
वाहनांना टोल माफ
गणोशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे. या सणानिमित्त लोक आपापल्या घरी जातात. अशा चाकरमान्यांच्या सोयीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोल माफ करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे या सणासुदीच्या काळात प्रवाशांना दिलासा मिळणार आहे तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी गणपती उत्सवानिमित्त एकूण 214 विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत या गाड्या चालवण्यात येणार आहेत.
राज्यात नवे सरकार आल्यापासून हा दुसरा मोठा निर्णय आहे. या अगोदर शिंदे सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल पाच रुपये आणि डिझेल तीन रुपये प्रति लिटरने स्वस्त झाले. आज आरे कारशेडवरील स्थगिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली. पर्यावरणाच्या कारणामुळे ठाकरे सरकारनं आरे कारशेडचं काम थांबवलं होतं. त्यानंतर कांजूरमार्ग इथं कारशेड करण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे-फडणवीस सरकार येताच आरेमध्ये पुन्हा कारशेड करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता उत्सवावरील निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला.