बारावी परीक्षार्थींसाठी केंद्रापासून बससेवा

आमदार संजय केळकर यांच्या सूचनेनंतर कासारवडवलीच्या केंद्रातील विद्यार्थ्यांना दिलासा

ठाणे: कासारवडवली येथील आदर्श विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेज या केंद्रातील बारावीच्या परीक्षार्थींना ठाण्यात येण्यासाठी होणारी असुविधा आमदार संजय केळकर यांच्या सूचनेमुळे दूर झाली आहे. ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेने या २५०हून अधिक विद्यार्थ्यांसाठी विशेष बससेवा सुरू केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

कासारवडवली येथे आदर्श विद्यामंदिर आणि ज्यू.कॉलेजमध्ये बारावी परीक्षेचे केंद्र असून येथे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील अडीचशेहून अधिक विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी पेपर सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांना बससाठी चालत घोडबंदर मार्गावर चालत यावे लागले. तर शेअर रिक्षा प्रती प्रवासी ६० ते ७० रुपये आकारत असल्याने विद्यार्थ्यांची अडचण होत होती.

ही बाब पालकांनी आमदार संजय केळकर यांच्या निदर्शनास आणल्यानंतर श्री.केळकर यांनी तत्काळ ठाणे महापालिकेच्या परिवहन व्यवस्थापकांना पत्र देऊन या विद्यार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याची सूचना केली. त्यानुसार बुधवार ११, १४ १७, २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १.५० वाजता परिवहनची बससेवा केंद्रापासून ठाणे स्टेशनपर्यंत उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही बस केंद्रापासून कासारवडवली, मानपाडा, कापूरबावडी, माजिवडे, गोकुळनगर, कोर्टनाका या मार्गाने स्टेशनकडे जाणार आहे. त्यामुळे कळवा, मुंब्रा आणि ठाण्यातील विद्यार्थ्यांना ऐन परीक्षाकाळात सुविधा मिळाल्याने पालकांनी श्री.केळकर यांचे आभार मानले आहेत.