शहापूर तालुक्यातील रांजणेकांबे ग्रामस्थांची कामगिरी
शहापूर: तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या गुंडे केंद्राअंतर्गत असलेल्या रांजणेकांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने लोकसहभागाच्या बळावर नवे रूप धारण केले आहे. कधीकाळी ताडपत्रीचा आधार घेऊन चालणारी ही शाळा आज स्वच्छ, सुसज्ज व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरावी अशी चकाचक झाली आहे.
शिक्षक आणि ग्रामस्थांच्या समन्वयातून साकार झालेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी शाळा इमारतीचे नुतनीकरण तसेच माजी विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला
रांजणेकांबे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दुरावस्थेमुळे फक्त चार विद्यार्थी ज्ञानार्जन करत होते. मात्र शिक्षकांची मेहनत आणि ग्रामस्थांचे सहकार्य यामुळे या शाळेत आता 18 विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. शाळेच्या शैक्षणिक दर्जाबरोबरच भौतिक सुविधांचा विकास करण्याचा निर्धार शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे केला. त्यानुसार वर्गखोल्यांची डागडुजी, रंगरंगोटी, स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शालेय परिसर स्वच्छता, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच विद्यार्थ्यांसाठी अनुकूल शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यात आले. लोकसहभागातून झालेली ही कामे ग्रामीण भागातील शाळा विकासाचा आदर्श ठरत आहेत.
शाळेच्या उद्घाटनप्रसंगी गटविकास अधिकारी बी. एच. राठोड यांच्यासह गटशिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे, प्रहार जनशक्तीचे तालुकाध्यक्ष वसंत पानसरे, विस्तार अधिकारी रामचंद्र विशे, विस्तार अधिकारी शिवानी पवार, उपसरपंच दिनेश रांजणे, ड्यू फाउंडेशनचे उल्हास देवल, केंद्र प्रमुख सुरेश ठाकरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मार्गदर्शन करताना मान्यवरांनी लोकसहभागातून शाळा विकासाचा हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
शासनाच्या योजना आणि स्थानिक सहभाग यांची सांगड घातल्यास ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा निश्चितच उंचावू शकतो, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ, विद्यार्थी सुरक्षा समिती, महिला तक्रार निवारण समिती, सखी सावित्री समिती तसेच पालकवर्गाने संयुक्तपणे केले. ग्रामस्थांनी श्रमदान, आर्थिक मदत आणि साहित्याच्या स्वरूपात दिलेल्या योगदानामुळे हा उपक्रम यशस्वी झाला.
लोकसहभाग, शिक्षकांची तळमळ आणि ग्रामस्थांची सकारात्मक भूमिका यामुळे रांजणेकांबे येथील जिल्हा परिषद शाळा आज नव्या ओळखीने उभी राहिली असून, ही शाळा आता ग्रामीण शिक्षणाच्या विकासाचा आदर्श नमुना ठरत आहे.