महापालिकांसाठी भाजपाची स्वबळाची चाचपणी

महायुतीतील घटकपक्ष आजमावणार ताकद?

ठाणे: कल्याण, ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी जास्त जागांची मागणी करत असल्याने भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणुका लढण्याची चाचपणी सुरु केली आहे. त्यामुळे राज्यात महायुती असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मात्र ‘एकला चलो रे’ ची भूमिका महायुतीचे पक्ष घेणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान होण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीकरिता कंबर कसली आहे. या निवडणुकीत महायुतीच्या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असली तरी शिवसेनेने मुंबई, ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत जास्त जागा मागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई येथे आले असताना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी भाजपा आणि महायुतीमधील नेत्यांची भूमिका स्पष्ट केली होती. मित्रपक्ष जर त्यांच्या ताकदीपेक्षा जास्त जागा मागत असतील तर स्वबळावर निवडणूक लढण्याची चाचपणी करावी, असा सूर भाजपामधून आला आहे. त्या दृष्टीने ठाणे, कल्याण आणि नवी मुंबई या महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत चाचपणी करावी, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचे समजते.

ठाणे महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवावी, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी करत आहेत तसेच नवी मुंबईची निवडणूक देखिल एकट्याने लढावी अशी भूमिका वनमंत्री गणेश नाईक यांनी वारंवार मांडली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे रविंद्र चव्हाण देखिल ‘एकला चलो रे’ या भूमिकेवर ठाम असल्याने या महापालिका निवडणुकीत महायुतीमधील घटकपक्ष स्वबळावर निवडणूक लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

राज्यातील २९ महापालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि काही ग्रामपंचायत यांच्या निवडणुका मागील तीन ते पाच वर्षे रखडल्या असून या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रशासनाच्या हातात आहे, त्यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडवले जात नसल्याची ओरड सुरु असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकर घेण्याची मागणी केली जात आहे.