ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात शहराध्यक्षांशी संवाद
ठाणे: आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीच्या विजयासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी झटून काम करावे. विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या साडेतीन महिन्यांचा कालावधी राहिला असून, पक्षकार्यकर्त्यांनी संघटनात्मक दृष्टीने पक्षाला मजबूत करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज येथे केले.
तर महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी निर्धार करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले. कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय व भाजपाच्या प्रदेश महाअधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, भिवंडी शहर, मिरा-भाईंदर, नवी मुंबई, उल्हासनगर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्रपणे बैठका घेण्यात आल्या. या बैठकीत भाजपाचे नेते व मंत्री रवींद्र चव्हाण बोलत होते. या वेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, माजी मंत्री व आमदार गणेश नाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश चौगुले, ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, ठाणे ग्रामीण अध्यक्ष मधुकर मोहपे, भिवंडी शहर अध्यक्ष हर्षल पाटील, मिरा-भाईंदरचे अध्यक्ष किशोर शर्मा, नवी मुंबईचे अध्यक्ष संदीप नाईक यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण पदवीधर मतदारसंघात निवडणुकीत पक्षाला ७५ टक्के मतदान झाले. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संघटनात्मक ताकदीने हा विजय साकारला. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी प्रत्येक मंडल व बूथ मजबूत करावा. प्रत्येक बूथसाठी प्रवासी योजना तयार करावी. प्रत्येक घरातील नागरिकांपर्यंत संपर्क साधावा. नवमतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, प्रत्येक मतदाराची नोंदणी करण्यावर भर द्यावा. विधानसभा निवडणुकीत भाजपासह महायुतीच्या उमेदवारांना ५१ टक्के मते मिळण्यासाठी झटावे, असे आवाहन मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले.
माजी केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनीही मार्गदर्शन केले. प्रत्येकाने पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता असे समजून राज्यात पुन्हा महायुतीच्या विजयासाठी कार्य करावे, असे आवाहन कपिल पाटील यांनी केले.
या बैठकीत आमदार संजय केळकर यांचेही भाषण झाले. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले.