ठाणेकर तरुणाचा प्रायोगिक प्रकल्प ठरणार कचरा समस्येवर उतारा
ठाणे : ठाण्यातील पर्यावरण शास्त्रातील पदव्युत्तर पदवीधारक तरुणाने घरातील कचरा डम्पिंगपर्यंत जाऊ न देता घराजवळच त्यापासून जैव खत तयार करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्या सहा वर्षांत त्याने सुमारे २०० किलो जैव खत तयार केले आहे. हा प्रयोग घरोघरी सुरू झाल्यास शहरातील कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास पर्यावरण अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
प्रतिक वालावलकर असे या तरुणाचे नाव असून तो रूनवाल नगर येथील रहिवासी आहे. शहरातील कचरा समस्या गंभीर होत असतानाच प्रतीक यांनी ऑगस्ट २०१३ मध्ये ठाण्यातील गृहसंकुलात निर्माल्य आणि भाजीपाल्याच्या कच-यापासून जैव खतनिर्मितीचा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला होता. हा प्रयोग यशस्वी झाला. जैव खतनिर्मिती प्रकल्पाच्या यशानंतर जानेवारी २०१५ मध्ये त्यांनी ते राहत असलेल्या गृहसंकुलांमधील झाडांच्या पालापाचोळ्यापासून गांडूळ खतनिर्मितीचा प्रकल्प सुरू केला. ज्यातून जवळपास ८०० किलोग्रॅम दर्जेदार अशा गांडूळ खताची निर्मिती झाली होती.
२०१५ साली मुंबईतील ख्यातनाम ‘ऑब्झर्वर रिसर्च फाऊंडेशन’ने (ओआरएफ) गृहसंकुलातील सेंद्रिय कचरा व्यवस्थापनविषयक या कामाची दखल घेतली आणि गृहसंकुलात सुरू केलेल्या जैव खत आणि गांडूळ खत प्रकल्पाला भेट दिली. या कामाचा समावेश त्यांनी ‘घनकचरा व्यवस्थापन’ या विषयावर आधारित एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केलेल्या ‘मुंबईतील विकेंद्रित घनकचरा व्यवस्थापन’ या त्यांच्या शोध निबंधात केला, अशी माहिती वालावलकर यांनी दिली.
‘आमच्या घरगुती सेंद्रिय कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सहा वर्षं पूर्ण झाली आहेत आणि गेल्या सहा वर्षांत या प्रकल्पामुळे आमच्या घरातला जवळपास ६०० किलो म्हणजेच, अर्धा टनपेक्षा अधिक सेंद्रिय कचरा आम्ही घराबाहेर जाण्यापासून रोखला आहे. या कच-याचे घरातच एका जैविकरित्या सक्रियित बादलीत जैव खतात रुपांतर केले आहे. जवळपास २०० किलो जैव खताची निर्मिती झाली आहे,असे श्री. वालावलकर म्हणाले.
घरात दररोज उत्पन्न होणारा सेंद्रिय कचरा शक्य तेवढा बारीक चिरून तो जैव खत निर्मितीच्या बादलीत नीट पसरवून टाकण्यात येतो. बादलीतील जैव विघटन प्रक्रिया कार्यान्वित झालेल्या थराशी तो एकरूप होईल अशा पद्धतीने तो ढवळला जातो. यासाठी अवघी दहा ते पंधरा मिनिटे लागतात. उत्कृष्ट प्रतीचे जैव खत नजरेने, गंधाने आणि स्पर्शाने ओळखण्याच्या काही खुणादेखील आहेत; त्याचा रंग काळा असतो, त्याला मातीचा वास असतो, वजनाने ते मातीपेक्षा हलके असते व त्यात मुबलक प्रमाणात ओलावा असतो आणि या सगळ्या खुणा आमच्या जैवखताशी अगदी तंतोतंत जुळतात, असे वालावलकर म्हणाले.
‘सेंद्रिय कचरा खाणारी बादली’ वापरण्याचे फायदेच फायदे आहेत. घरातील स्वयंपाकघरात रोज उत्पन्न होणा-या सेंद्रिय कच-याचे आणि देवघरातील निर्माल्याचे घरगुती पातळीवरच दुर्गंधी विरहित अशा शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होत राहते आणि या विघटन प्रक्रियेतून घरातील झाडांच्या वाढीसाठी आणि मातीची सुपीकता, तिचा पोत वाढवण्याकरिता आवश्यक असणा-या या पोषक घटकांनी युक्त अशा दर्जेदार सेंद्रिय खताची निर्मिती होत राहते. तयार झालेले दर्जेदार सेंद्रिय खत आपण रास्त दरात विकूही शकतो.
सेंद्रिय कच-याच्या विघटन प्रक्रियेतून निघणा-या पाण्यात सेंद्रिय खतातील पोषक घटक मिसळलेले असल्याने सेंद्रिय खताप्रमाणेच ते पाणीही आपण घरातील वृक्षांच्या मातीत टाकू शकतो. शहरांमधील सार्वजनिक कचराकुंड्या आणि कचराभूमीच्या आजुबाजूच्या परिसरात दुर्गंधी आणि रोगराई पसरवण्यासाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरणारा सेंद्रिय कचरा घराबाहेर जाण्यापासून रोखला जातो. ज्यामुळे शहरांमधील सार्वजनिक कचराकुंड्या आणि कचराभूमीवरील भार कमी व्हायला मदत होते,अशी माहिती श्री. वालावलकर यांनी दिली.