मंडपासाठी रस्ते खोदल्यास दंडात्मक कारवाई
ठाणे : गणेशोत्सवाच्या मंडपासाठी सार्वजनिक रस्त्यावर खड्डे केल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका प्रशासनाने दिला आहे. तसेच या काळात रस्ते डेब्रिज, कचरा आणि फेरीवालामुक्त ठेवावेत, अशा सक्त सूचना सहायक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गणपतीचे आगमन आणि विसर्जनाच्या मिरवणुका या स्वच्छ आणि खड्डेमुक्त रस्त्यांवरून निघतील, अशी अपेक्षा ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
गेल्यावर्षी मंडपासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांचा वापर यंदा केल्यास त्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार नाही तर नव्याने खड्डे करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रस्ते कचरा, डेब्रीज, खड्डेमुक्त आणि फेरीवालामुक्त राहतील या दृष्टीने सर्व सहाय्यक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांनी प्रभाग समितीनिहाय प्रत्यक्ष पाहणी करुन संपूर्ण उत्सव काळात सतर्क रहावे, असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत दिले.
गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीचे मार्ग सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी ही प्रत्येक सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंत्यांची आहे. ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तेथील रस्ते दुरूस्तीची कामे ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करुन घ्यावीत. कार्यकारी अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात प्रमुख मार्गापासून अंतर्गत रस्त्यांना भेटी देऊन आवश्यक कामे तातडीने पूर्ण करावीत. रस्त्यावर सार्वजनिक उत्सवासाठी मंडप उभारताना रस्त्याचे नुकसान होणार नाही या दृष्टीने सर्वानी खबरदारी घेण्याचे निर्देश आयुक्त अभिजित बांगर यांनी बैठकीत दिले आहेत.
सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर सी.सी.टिव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. या सर्व कामांवर नगरअभियंता यांनी नियंत्रण ठेवावे असेही आयुक्त बांगर यांनी बैठकीत नमूद केले.
संपूर्ण गणेशोत्सव काळात शहर स्वच्छ राहिल या दृष्टीकोनातून संबंधितांनी खबरदारी घ्यावी. सहाय्यक आयुक्त यांनी हजेरी शेडवर भेटी देऊन साफसफाईच्या कामाचा आढावा घ्यावा. ज्या हजेरी शेडवर नियुक्त कर्मचाऱ्यांपेक्षा संख्या कमी असेल त्या कंत्राटदारावर कारवाई प्रस्तावित करावी. यांत्रिकी पध्दतीने रस्त्याची सफाई होईल याकडे लक्ष द्यावे. उत्सव कालावधीमध्ये यांत्रिकी पध्दतीने साफसफाई अधिक काळ करावी, असे आयुक्तांनी नमूद केले.
यापुढे कृत्रिम तलाव हे खड्डा न खणता तयार करावेत, जेणेकरुन जागेचे नुकसान होणार नाही आणि संभाव्य अपघातही टाळू शकतो. शहरभर टप्प्याटप्प्याने कृत्रिम तलावांची संख्या वाढविल्यास नागरिकांना गणेश विसर्जनासाठी फार दूर जाण्याची गरज पडणार नाही, असे मतही आयुक्तांनी व्यक्त केले.