१७ जणांच्या मृत्यू प्रकरणी सहायक आयुक्ताला अटक

भाईंदर: विरार येथील रमाबाई अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी वसई-विरार शहर महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गिल्सन गोन्सालवीस यांना मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने गुरुवारी मध्यरात्री उशिरा अटक केली. या दुर्दैवी दुर्घटनेत १७ लोकांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. या घटनेतील कथित निष्काळजीपणाच्या आरोपावरून गोन्सालवीस यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका उच्चपदस्थ महापालिका अधिकाऱ्याला अटक झाल्यामुळे वसई-विरार परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

विरार पूर्वेकडील विजयनगर परिसरातील चार मजली रमाबाई अपार्टमेंटची इमारत २६ ऑगस्ट २०२५ रोजी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोसळली होती. ही इमारत अनधिकृत असून, त्यात सुमारे ५० फ्लॅट्स होते. बांधकामानंतर काही वर्षांतच ती धोकादायक झाली होती. या दुर्घटनेनंतर, पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी या संवेदनशील प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा युनिट ३ कडे सोपवला होता. या प्रकरणातील प्राथमिक तपासात, पोलिसांनी बिल्डर नितळ साने (४८), भूखंड मालक आणि अन्य पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. बिल्डर नितळ साने अद्यापही तुरुंगात आहे, तर चार आरोपींना जामीन मिळाला आहे. तपासादरम्यान, गुन्हे शाखा युनिट ३ ने महापालिकेच्या प्रभाग समिती (सी) चे प्रमुख असलेल्या सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवेस यांच्यावर निष्काळजीपणाचे विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले.

पोलीस तपासात गोन्सालवीस यांच्याकडून झालेल्या गंभीर चुका उघड झाल्या. चौकशीत असे आढळले की इमारत धोकादायक झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त गोन्सालवेस यांनी सन २०२५ तपासादरम्यान, गुन्हे शाखा युनिट ३ ने महापालिकेच्या प्रभाग समिती (सी) चे प्रमुख असलेल्या सहाय्यक आयुक्त गिल्सन गोन्सालवेस यांच्यावर निष्काळजीपणाचे विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले.

पोलीस तपासात गोन्सालवेस यांच्याकडून झालेल्या गंभीर चुका उघड झाल्या. चौकशीत असे आढळले की इमारत धोकादायक झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त गोन्सालवेस यांनी सन २०२५ मध्ये इमारतीला नोटीस बजावली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, धोकादायक स्थिती असूनही रहिवाशांना इमारत खाली करण्यास कोणतीही पुढील कार्यवाही करण्यात आली नाही, असे पोलिसांना आढळून आले. वेळीच इमारत रिकामी केली असती, तर १७ लोकांचा जीव वाचू शकला असता, असा पोलिसांचे मत आहे. या प्रकरणात गोन्सालवीस यांचा निष्काळजीपणा आढळल्याने पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली.

गुन्हे शाखा युनिट ३ ने या प्रकरणी गोळा केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबानीसह चार हजार पानांचे सविस्तर दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते की, महापालिकेच्या अन्य अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा तपास अद्याप सुरू आहे आणि ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल केले जातील.