* चार तासांत १६० मि.मी. पावसाची नोंद
* ६० कुटुंबे स्थलांतरित
बदलापूर : आज पहाटेपासून मुसळधार पावसाने बदलापूरला झोडपले. सर्व सखल भागात पाणीच पाणी अशी परिस्थिती, त्यात उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बदलापूरवर पूरसंकट ओढवण्याची चिन्हे दिसत होती. मात्र सुदैवाने दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाला आणि अधूनमधून पावसाने विश्रांतीही घेतली. त्यामुळे हळहळू पाण्याची पातळी कमी होत गेली आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत पाण्याची पातळी इशारा पातळीच्याही खाली आली. त्यामुळे बदलापूरकरांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
आज सोमवारी पहाटेपासून बदलापूर परिसरात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू झाला आणि त्यात रायगड जिल्ह्यातील कर्जत आणि माथेरान पट्ट्यातही पावसाचा जोर असल्याने सकाळपासून उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत गेली. दुथडी भरून वाहत असलेल्या उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास १६.४६ मीटरपर्यंत पोहोचली होती. नंतर थोड्याच वेळात उल्हासनदीने १६.५० मी. ही इशारा पातळी ओलांडली होती. पुन्हा उल्हासनदीच्या पाण्याची पातळी वाढून उल्हासनदीने १७.५० मी. ही धोक्याची पातळीही ओलांडली. त्यानंतरही पाऊस सुरूच असल्याने बदलापुरात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली होती.
दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर बदलापूरचे सखल भाग जलमय होऊन पूरपरिस्थिती निर्माण होत असते. त्यात आज पहाटेपासून चार तासात १६० मि.मी. पाऊस झाला. त्यामुळे सतर्क असलेल्या नगरपरिषद प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नदी लगतच्या सखल भागातील ५० ते ६० कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित केले. मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सकाळपासून शहराच्या भागभागात फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना नगर परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. उद्घोषणा करून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. उल्हासनदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर खबरदारी म्हणून काही वेळ उल्हासनदी पूल रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. नदी परिसरात अग्निशमन दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
बदलापुरात दरवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात होत असते. खूप पाऊस झाल्यास जुलै अखेरीस उल्हास नदी दुथडी भरून वाहू लागते असा आतापर्यंतचा अनुभव आहे. परंतु यंदा मात्र पहिल्यांदाच मे महिन्यात अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. चार तासांत 160 मि.मी. पावसाची नोंद झाली. बदलापूर-कर्जत रस्त्यावर चामटोली भागातही पाणी साचले होते. कुडसावरे पूलही पाण्याखाली गेला होता.