शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपक्रम
ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता ४.०८ टक्के, अंक ओळख नसलेल्यांची २.२९ टक्के
ठाणे : तीन महिन्यांपूर्वी अजिबात अक्षर ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२.७९ टक्के इतकी होती. यात घट होऊन आता ४.०८ टक्के इतकी झाली आहे आणि अंक ओळख नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १८.१९ टक्के इतकी असताना, यात घट होऊन ही संख्या आता २.२९ टक्के झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरात वाढ होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांच्या संकल्पनेतून आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणा-या सामाजिक संस्थांच्या वतीने मुलांच्या या गुणवत्ता दरात वाढ करण्यासाठी गेल्या तीन महिन्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. याच उपक्रमांचे फलित म्हणून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरात कमालीची वाढ झाल्याची सकारात्मक बाब समोर आली.
कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षणामुळे जिल्ह्यातील पहिली ते तिसरीपर्यंत शिकणा-या विद्यार्थ्यांच्या अक्षर ओळख आणि संख्या आकलन क्षमतेमध्ये कमालीची घट झाल्याची चिंताजनक बाब एका सर्वेक्षण अहवालातून समोर आली होती. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून शासनाने कोरोना काळात ‘ऑनलाईन’ शिक्षणाचा पर्याय स्वीकारला होता. या ऑनलाईन शिक्षणाचा सर्वाधिक फटका पहिली ते चौथीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना बसला. या इयत्तांमध्ये प्रामुख्याने अक्षर, अंक ओळख तसेच अक्षर वाचन यांसारख्या गोष्टींतून शिक्षणाचा पाया रचला जातो.
ऑनलाईन शिक्षणातून यांसारख्या गोष्टी विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात शिकता न आल्यामुळे त्यांच्या गुणवत्ता दरावर काय परिणाम झाला आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण मोहिम राबविली होती. यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता दरावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. हा दर सुधारण्यासाठी जिल्हा परिषद, ‘जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था राहटोली आणि सिखे संस्था’ यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत उमंग अभियान राबविण्यात आले होते.
या अंतर्गत जिल्ह्यातील १,३२८ शाळांतील पहिली ते तिसरीत शिकणा-या ३८,०२४ विद्यार्थ्यांच्या अक्षर, अंक ओळख तसेच अक्षर वाचन याच्या विविध चाचण्या घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अक्षर ओळख येत नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या २२.७९ टक्के इतकी होती. या अभियानानंतर लक्षणीय घट होऊन अक्षर ओळख येत नसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या आता ४.०८ टक्क्यांवर आली आहे. शब्द वाचन करणा-या विद्यार्थ्यांची संख्याही २८.४५ टक्क्यांवरुन ५१.१६ टक्के विद्यार्थी परिच्छेद आणि गोष्ट वाचन करू लागले आहेत.
तसेच ० ते ९ संख्याज्ञान असणारे विद्यार्थी संख्या ३८.६० टक्के, ९९ पर्यंत संख्याज्ञान असणारे २५.५२ इतकी होती. संख्या ज्ञान असलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होऊनही संख्या सध्या ७०.६७ इतकी झाली आहे. यातील बहुसंख्य विद्यार्थी बिनहातच्याची बेरीज आणि वजबाकी करू लागले आहेत.
उमंग अंतर्गत राबविलेले उपक्रम
विद्यार्थ्यांना विविध गोष्टींच्या आधारे भाषेची तसेच शब्दांची ओळख करून देण्यात आली. शाळेत विद्यार्थ्यांकडून नियमितपणे पाठांतर तसेच जोडशब्दांचे वाचन करून घेण्यात आले. मनोरंजनात्मक उपक्रमांद्वारे अक्षरांची ओळख करून देण्यात आली. विविध संख्यांच्या आकृती तसेच चित्रांद्वारे विद्यार्थ्यांना गणिताची ओळख करून देण्यात आली. खेळीमेळीच्या वातावरणात आणि मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिल्याने त्यांच्या गुणवत्ता दरात वाढ झाली आहे. यामध्ये संस्थेचे स्वयंसेवक तसेच सर्व शाळांचे शिक्षकवर्ग आणि जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली.
प्रशिक्षणामुळे भाषा, गणितातील गतीमानता वाढणार – डॉ. पवार
ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या भाषा आणि संख्या आकलनामध्ये मोठा परिणाम झाला होता. हा गुणवत्ता दर सुधारण्यासाठी मागील तीन महिने उमंग अभियान राबविण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता दर सुधारण्यास मोठी मदत झाली आहे. तसेच येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची भाषा व गणितातील गतीमानता वाढण्यास या प्रशिक्षणाचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील रहाटोली येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. भरत पवार यांनी व्यक्त केला.