खासदार नरेश म्हस्के यांनी वेधले रेल्वे मंत्र्यांचे लक्ष
नवी दिल्ली: ठाणे आणि मुलुंड स्टेशन दरम्यानच्या नवीन रेल्वे स्थानकाच्या कामाला गती द्यावी, दिवा-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा दादरपर्यंत सुरू करावी, कोकणच्या सर्व गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा द्यावा, कल्याण-पुणे लोकल करावी, दिवा-वसई लोकल सेवा वाढवावी, रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या स्पेशल ट्रेन मध्ये ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांच्यासाठी काही जागा राखीव ठेवाव्यात, अशा विविध मागण्या ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.
लोकसभेत रेल्वे मंत्रालयाशी संबंधित अनुदानित मागण्यांवर चर्चा करतांना ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, सोईसुविधा आणि त्याचबरोबर नवीन गाड्या सुरू करण्यासंदर्भात आग्रही मागण्या केल्या.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे बुलेट ट्रेनचं काम वेगाने सुरू आहे. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाला `व्हाइट एलिफंट’ (निरुपयोगी प्रकल्प) म्हणून हिणवलं होतं. पण महाराष्ट्राच्या जनतेला `स्पीड ब्रेकर’ नव्हे, तर `एक्सप्रेसवे’ सारखा वेगवान विकास हवा आहे. महाविकास आघाडीचा विकास म्हणजे इंजिन शिवाय धावणारी ट्रेन होती. `भ्रष्टाचार एक्सप्रेस’ गतीने ती धावत राहिली आणि खरा विकास प्लॅटफॉर्मवरच उभा राहिला. आज मोदी सरकारच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्रात रेल्वे क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती होत असल्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
कल्याण-वाशी (ऐरोली मार्गे) लोकल सेवा सुरू करावी, जेणेकरून ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी होईल. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते उरण लोकल सेवा सुरू करावी. कल्याण रेल्वे यार्डात जे काम पूर्ण झाले आहे, त्या भागातून लांब पल्ल्याच्या गाड्या चालवण्यास सुरुवात करावी जेणेकरून लोकल गाड्यांची वाट मोकळी होईल आणि होणारा विलंब टाळता येईल. ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि बदलापूरहून महिलांसाठी विशेष लोकल सुरू करावी. सर्व स्थानकांवर स्वच्छ आणि दर्जेदार शौचालयांची व्यवस्था करावी. प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवाव्यात. सकाळी व रात्री महिला डब्यांमध्ये महिला सुरक्षा रक्षक तैनात करावेत. अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ सरकारी व खासगी रुग्णालयात मोफत उपचार मिळावेत. कल्याण, ठाणे, डोंबिवली येथे एडीआरएम स्तराचे अधिकारी नियुक्त करावेत. ठाणे जिल्ह्यातील सर्व रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवावे, रेल्वे उड्डाणपूल व अंडरपास प्रकल्प जलद पूर्ण करावेत. ठाणे आणि मुलुंड स्टेशनच्या दरम्यान नवीन स्टेशनचे काम सुरु आहे. हे काम रेल्वे करीत आहे, परंतु खर्च ठाणे महानगरपालिका करीत आहे, त्याचा वाढीव खर्च रेल्वेने करावा व अधिकाऱ्यांना तसे निर्देश द्यावेत व नवीन रेल्वेच्या कामाला गती द्यावी. याचबरोबर स्टेशनवरची वन रुपीज क्लिनिक केंद्रे बंद आहेत, ती लवकरात लवकर सुरू करावीत. ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण अशा सर्व ठिकाणी ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करावी, अशा विविध मागण्या खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केल्या.