रुग्ण आणि नातेवाईकांना दिलासा
ठाणे: वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्णांसाठी आता वार्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. ही नवीन वातानुकूलित यंत्रणा बसवल्यामुळे संपूर्ण रुग्णालय गारेगार होणार आहे. वातानुकूलित यंत्रणा बसवल्यामुळे रुग्णांना आणि रुग्णांसोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईकांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मोठ्या खाजगी रुग्णालयातील जनरल वॉर्डचा फिल आता वास्तवात ठाणे सिव्हील रुग्णालयात रुग्णांना मिळणार आहे. रुग्णांना उष्म्याची झळ पोहोचणार नाही याची खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालयातील तब्बल १५० खाटांचा टेंट (तंबू) बंदिस्त असल्याने आतील हवा गरम असते. परंतु आता टेंटमध्ये वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे फॅन टेंटमधील वातावरण गारेगार रहाणार आहे.
नऊ महिन्यांपूर्वी सिव्हील रुग्णालय पाडून या जागेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधल जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वागळे इस्टेट मनोरूग्णालयाशेजारी आरोग्य विभागाच्या जागेत तात्पुरत्या स्वरूपाचे सिव्हील रुग्णालय उभारले आहे. या रूग्णालयात दरदिवशी सुमारे ५०० ते ६०० रुग्ण उपचारासाठी येत असतात.
रुग्णालयात ३४६ खाटा असून या पैकी सुमारे १५० खाटा या टेंटमध्ये आहेत. आता उष्मा वाढल्याने उष्माघाताचे रुग्ण उपचारासाठी येण्यास सुरुवात झाली आहे. त्यात टेंटमधील वातावरण वाढत्या उन्हामुळे गरम होत असून, रुग्णांच्या आरोग्यावर या उष्णतेचा परिणाम होऊ नये यासाठी टेंटमध्ये वातानुकूलित यंत्रणा कार्यान्वित होणार आहेत.
ठाणे शहराचे तापमान दिवसागणिक वाढत आहे. उन्हाचा पारा ४० अंशावर आला आहे. त्यामुळे सिव्हील रुग्णालयात टेंटमध्ये कुलर फॅन आणि वातानुकूलित यंत्रणा बसवली जाणार आहेत. टेंटच्या तीन भागात जनरल, मेडीसिन, महिला, ओर्थो इत्यादी विभागासाठी खाटा आहेत. कायमच रुग्णांनी भरलेल्या टेंटमध्ये या उन्हाळ्याच्या दिवसात वातावरण अतिशय उष्ण होते. मात्र आता रुग्णांच्या सोयीसाठी गारवा निर्माण केला जाणार आहे.
टेंटमध्ये वातानुकूलित यंत्र आणि कुलर फॅनची सोय रुग्णांसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. तापमान वाढल्याने उष्माघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून सकाळी १० ते ४ या वेळेत महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. फिरताना टोपी, पाण्याची बाटली, छत्री, ओढणी सोबत ठेवावी, असा सल्ला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिला.