तीव्र कमी दाबाच्या पट्ट्याने थंडी पळाली

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली, तरी बोचरी थंडी अद्याप पडलेली नाही.

हिमालयीन भागात तयार झालेल्या पश्चिमी चक्रावाताचा परिणाम उत्तर भारतात झाला आहे. त्यामुळे या भागात दाट धुके आणि थंडीचा कडाका वाढला आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात अद्याप बोचरी थंडी पडलेली नाही. दरम्यान, राज्यात दिवसभरात औरंगाबादचे किमान तापमान ११ अंश सेल्सिअस नीचांकी नोंदविण्यात आले. सलग तिसऱ्या दिवशी औरंगाबादेतील किमान तापमान नीचांकी नोंदविण्यात आले आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली असली, तरी बोचरी थंडी अद्याप पडलेली नाही. पहाटे आणि सकाळच्या सुमारास थंडी जाणवत आहे. त्यानंतर दुपारपासून सायंकाळपर्यंत वातावरणात एक प्रकारचा उष्मा जाणवत आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी थंडी पडत असल्याचे वातावरण आहे.

बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा आता उत्तरेकडे सरकला असून पुढील ४८ तासांत तो कोमोरीन भाग पार करून श्रीलंकेकडे सरकणार आहे. त्यामुळे दक्षिणेकडून महाराष्ट्राकडे येणारे बाष्पयुक्त वारे कमी होणार आहेत, तर उत्तरेकडून राज्याकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांचे प्रमाण अजूनही कमी आहे. या थंड वाऱ्यांचा प्रभाव पुढील दोन ते तीन दिवसांत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना बोचरी थंडी अनुभवण्यास मिळण्याची शक्यता जास्त आहे.