ठाणे: अवघ्या दोन लाखांत म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून गरजूंना जाळ्यात ओढणारी टोळी ठाण्यात सक्रिय झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने म्हाडाचे बोगस ॲलॉटमेंट पत्र देखिल ही टोळी देत असल्याचे समोर आले आहे. पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तर भरलेले पैसे परत मिळणार नाहीत या भीतीने काही नागरिक पोलिसांकडे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याची माहिती समोर येत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या विविध सरकारी योजनांमधून सर्वसामान्य नागरिकांना घरे उपलब्ध होत असून याचाच फायदा घेत काही मंडळींकडून अशाप्रकारच्या नागरिकांना हेरण्याचे प्रकार ठाण्यात समोर आले आहेत. म्हाडाचे घर देतो असे सांगून या मंडळींकडून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. असे बरेच फसवणुकीचे प्रकार सध्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे उप मुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही गरीबांकरिता घरे उपलब्ध करून दिली असून अवघ्या दोन लाखांत वर्तकनगर येथिल घर मिळते असे आमिष या टोळीने दाखवले आहे. या टोळीत दोन महिला कार्यरत आहेत, असे देखिल सूत्राने सांगितले आहे.
नौपाडा येथिल एका मंदिरामध्ये गरजूंना बोलावून त्याला विश्वासात घेतले जाते. त्यानंतर डॉ. आंबेडकर रोड येथे बोलावून त्यांच्याकडून दोन लाख रुपये उकळले जातात. टोळीकडून म्हाडाच्या अधिकाऱ्याची सही असलेले बोगस प्रमाणपत्र देखील नागरिकांना देण्यात येत आहे. ज्यामध्ये त्यांना म्हाडाचे घर लागले असल्याचे नमूद करण्यात येत असून म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे नाव, त्यांचा हुद्दा देखील नमूद करण्यात आल्याने या बोगस प्रमाणपत्राला सर्वच नागरिक फसत असल्याचे निदर्शनास आले आहे.
असे काही बोगस प्रमाणपत्र देऊन आणखी नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार घडू नयेत यासाठी ज्यांनी या घरासाठी पैसे भरले आहेत त्यातीलच काही लोकांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. म्हाडाचे घर देण्याचे आमिष दाखवून कोणी पैसे घेत असेल तर अशा लोकांकडून फसवणूक करून घेऊ नये तसेच म्हाडाने देखील याची दखल घेण्याची आवश्यकता असल्याची मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांकडून केली जात आहे.
ठाणे पोलिसांनी या टोळीचा मागोवा घेऊन आणखी काही गरीब गरजवंतांची फसवणूक होऊ नये म्हणून या टोळीला जेरबंद करावे अशी मागणी पुढे येत आहे.
या बोगस ॲलॉटमेंटबाबत म्हाडाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि म्हाडा लॉटरी काढून घर वितरित करत असते. त्याकरिता रीतसर प्रक्रिया पूर्ण करावी लागते, त्याशिवाय म्हाडा कोणालाही घर देत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.