भाईंदर: शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून आज घोडबंदर किल्ल्याच्या बुरुजावर १०५ फूट उंच हिंदवी स्वराज्याचे प्रतीक असलेला सगळ्यात मोठा भगवा ध्वज डौलाने फडकला आणि ‘छत्रपती शिवाजी महाराज कि जय’, ‘हर हर महादेव’ असा जयघोष दुमदुमला.
हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत आधी ध्वजपूजन यात्रा काढून, मंत्रोच्चारात पुरोहितांकडून ध्वजाची पूजा करून या भगव्या ध्वजाची बुरुजावर स्थापना करण्यात आली. २४ तास दिवस रात्र हा ध्वज येथे फडकणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर उभा राहिलेला महाराष्ट्रातील हा पहिला भगवा ध्वज स्थापन करण्याची ही घटना ऐतिहासिक असल्याचे मत सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.
घोडबंदर किल्ल्याप्रमाणेच राज्यातील इतर गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठीही यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आपण अधिवेशनात सरकारकडे आग्रह धरू, असे यावेळी आमदार सरनाईक यांनी जाहीर केले.
आज १९ फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हणजेच शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य ध्वज प्रतिष्ठापना सोहळा हजारो शिवभक्त , स्थानिक ग्रामस्थ , मीरा भाईंदरकर नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला. बुरुजावर १०५ फूट उंच ध्वजस्तंभ आहे. तर भगवा ध्वज २० फूट उंच व ३० फूट लांब ध्वज आहे. हा ध्वज २४ तास फडकत राहील. विशेष म्हणजे हा ध्वज रात्रीही दिसावा यासाठी आकर्षक अशी विद्युत व्यवस्था ध्वजाच्या दिशेने करण्यात आली आहे. आज रिमोटच्या साहाय्याने १०५ फूट उंच ध्वज स्तंभावरून ध्वज वर गेला आणि आकाशात ध्वज डौलाने फडकला. आमदार प्रताप सरनाईक, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे , पोलिस आयुक्त मधुकर पांडे, आयुक्त दिलिप ढोले यांच्या हस्ते हा भगवा ध्वज रिमोटचे बटन दाबून ध्वज स्तंभावर आकाशात उंच फडकला. ज्यांच्या संकल्पनेतून हा भगवा ध्वज उभा राहिला त्या आमदार प्रताप सरनाईक यांचा शिवप्रेमींकडून सत्कार करण्यात आला. ११ पुरोहितांनी विधिवत ध्वजाचे पूजन केले. या ध्वज स्थापनेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांनी आमदार निधीतून ५० लाखांचा आमदार निधी दिला होता.
ध्वजपूजन यात्रा, भव्य मिरवणूक
सकाळी घोडबंदर गावातील श्री दत्त मंदिरापासून ढोलताशाच्या गजरात, तुतारीच्या निनादात ‘ध्वज पूजन यात्रा’ निघाली. झांज पथक, लेझीम पथक, ढोलताशांचा गजर आणि तुतारीचा निनाद करत भव्य यात्रा निघाली. सकाळी गावातील तरुणांची बाईक रॅलीही निघाली. भगवे फेटे आणि टोप्यांनी वातावरण भगवे झाले होते. स्थानिक महिला व शिवसेना महिला आघाडीने डोक्यावर मंगल कलश घेऊन ‘कलश यात्रा’ काढली. सगळे वातावरण भगवे आणि शिवमय झाले होते. गावातून ही ध्वजपूजन यात्रा निघाली. श्री दत्त मंदिरात ध्वजाचे पूजन करून पालखीतून भगवा ध्वज किल्ल्यात आणला गेला. स्वतः आमदार सरनाईक यांनी पालखी खांद्यावर घेतली. यावेळी घोडबंदर गावातील ग्रामस्थ, दुर्ग व शिवप्रेमी मोठ्या संख्येने आज घोडबंदर किल्ल्यावरील भगव्या ध्वजाला मानवंदना देण्यासाठी उपस्थित होते. महिला, लहान मुले-मुली यांनी पारंपरिक वेशभूषा केली होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले तरुण, मावळे घोड्यावर स्वार होऊन आले होते तसेच इतरही महापुरुषांच्या वेशभूषा लहान मुलांनी केल्या होत्या.
ध्वज स्तंभावर २४ तास फडकणारा ध्वज दर १ महिन्याने बदलला जाईल. कारण वारा, धूळ किंवा इतर कारणाने फडकणाऱ्या ध्वजाला काही झाल्यास दर महिन्याने तो ध्वज सन्मानाने खाली उतरवून त्याजागी धुतलेला दुसरा ध्वज फडकवला जाईल. असे एकूण सात मोठे ध्वज उपलब्ध करून ठेवण्यात आले आहेत. म्हणजे पूर्णपणे नियोजन करून ध्वजाची पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही सांगण्यात आले. याबाबतच्या सूचना आमदार सरनाईक यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.