भातसा धरण ९० टक्के भरले

२१४ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू

शहापूर: शहापूर तालुक्यातील मुंबई महानगरपालिकेसाठी महत्वपूर्ण जलस्रोत असलेल्या भातसा धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून गुरुवारी सकाळच्या आकडेवारीनुसार धरणात ८९.५६टक्के पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे जलसाठ्यात वाढ होत असून आवश्यकतेनुसार सांडव्यातून पाण्याचा विसर्गही सुरू ठेवण्यात आला आहे.

धरणाची पाणीपातळी १३८.४० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ८४३.७५७ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा ८७७.७५७ दशलक्ष घनमीटर इतका झाला आहे. धरण क्षेत्रात गुरुवारी ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून यंदाच्या हंगामातील एकूण पाऊस २२९३ मि.मी. इतका झाला आहे.

धरण सुरक्षित ठेवण्यासाठी सांडव्यातून १९२.३८५ क्युमेक्स (६७९४.०७६ क्युसेक्स) पाण्याचा विसर्ग सुरू आहे. याशिवाय विद्युतगृहातून २२.५५ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग केला जात असून एकूण विसर्ग २१४.९३५ क्युमेक्स (७५९०.४३० क्युसेक्स) इतका आहे. म्हणजे प्रती सेकंद दोन लाख १४,९३५ लिटर पाणी सोडले जात आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी आज कोणताही पाणीउपसा नोंदविण्यात आलेला नाही. तसेच सिंचनासाठी अथवा उजव्या कालव्याद्वारेही पाणी सोडण्यात आलेले नाही. तथापि सध्या धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असल्याने प्रशासनाकडून धरण परिसरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातील पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.