मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी

अन्न-पाण्याविना हजारो चालक व प्रवासी तासनतास खोळंबले

डहाणू: मुसळधार पावसामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटेपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. गुजरातमधील दमणगंगा नदीला आलेल्या महापुराचे पाणी महामार्गावर आल्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर दोन्ही बाजूंची हजारो वाहने अडकून पडली होती.

शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर अडकलेली वाहने एकाच वेळी मार्गस्थ झाली आणि महामार्गावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पहाटे ५.३० वाजेपासून गुजरात वाहिनीवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून आच्छाड ते मनोर या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विवळवेढे येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने वाहतूक सेवा रस्त्यावरून वळवण्यात आली आहे ज्यामुळे कोंडीत अधिक भर पडली आहे.

चालकांच्या म्हणण्यानुसार गेल्या १२ ते १५ तासांपासून त्यांना पिण्याचे पाणी आणि अन्न मिळालेले नाही. छोट्या प्रवासी वाहनांतून प्रवास करणाऱ्या लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचे यात प्रचंड हाल झाले आहेत.