जिल्हा परिषदेत ५३ कंत्राटी कर्मचारी शासन सेवेत रुजू

१४ ते २५ वर्षे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा

ठाणे : सर्व शिक्षा अभियान व समग्र शिक्षा अंतर्गत सन २००१-०२ पासून कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद ठाणे येथील ५३ कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शासनाच्या निर्देशानुसार समायोजन करून त्यांना शासन सेवेत रुजू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गेली १४ ते २५ वर्षे सातत्याने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्व शिक्षा अभियानाची सुरुवात सन २००१-०२ मध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद नियमावली, १९९४ तसेच १३ मार्च, २००३ रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हा व तालुकास्तरावर विविध पदांची निर्मिती करण्यात आली होती. जिल्हास्तरावर निवड समिती स्थापन करून वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आणि लेखी व तोंडी परीक्षांच्या माध्यमातून गुणवत्तायादीच्या आधारे या अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

समग्र शिक्षा विभागामध्ये कार्यकारी अभियंता, जिल्हा समन्वयक, कनिष्ठ अभियंता, डाटा एन्ट्री ऑपरेटर व सहाय्यक, वरिष्ठ लेखा लिपिक तथा रोखपाल, एमआयएस समन्वयक आणि विषयतज्ज्ञ अशा विविध पदांवरील एकूण ५३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते. या सर्वांनी शैक्षणिक योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने योगदान दिले असून त्यांची सेवा १४ ते २५ वर्षांपर्यंतची आहे.

या कर्मचाऱ्यांनी सर्व शिक्षा अभियानापासून समग्र शिक्षा अभियानापर्यंतच्या प्रवासात शाळांच्या पायाभूत सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, डिजिटल माहिती व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम तसेच विविध शैक्षणिक योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.