नियमांचे पालन न केल्यास कारवाई
कल्याण: अन्न सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, उपहारगृहे, ढाबे, कॅन्टीन आणि क्लाऊड किचन चालकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत कल्याण-डोंबिवली विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत देशमुख यांनी हॉटेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ग्राहकांना मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, परिसरात स्वच्छता राखणे, अन्न सुरक्षा नियमांचे पालन करणे, परवान्यांचे वेळेत नूतनीकरण करणे आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
शासनाने जारी केलेल्या नियमांची पुढील तीन दिवसांत काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, त्यानंतर तपासणी मोहिमेद्वारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हॉटेल व्यावसायिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आवश्यक सुधारणा दोन ते तीन दिवसांत पूर्ण करण्याची ग्वाही दिली.
याबाबत बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, अन्न तयार करण्याची प्रक्रिया, पॅकेजिंग, साठवण आणि वितरण यासंदर्भातील अन्न सुरक्षा कायदा व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. ग्राहकांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून सर्व अन्न व्यावसायिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
ते पुढे म्हणाले, तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. स्वच्छतेचा अभाव, खाद्यतेलाचा वारंवार वापर, तापमान नियंत्रणातील त्रुटी, सुरक्षित पिण्याच्या पाण्याची अनुपलब्धता आणि अन्न हाताळणीतील निष्काळजीपणा यांसारख्या बाबी ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. त्यामुळे सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.