वर्षातून दोनपेक्षा अधिक संधी
ठाणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) भरती प्रक्रियेत मोठा बदल करत पूर्व परीक्षा टप्प्याटप्प्याने संगणकाधारित (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट-सीबीटी) पद्धतीने घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या बदलाची सुरुवात २,६१९ पदांसाठी जाहीर झालेल्या महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६पासून होणार आहे.
२०२७पासून राज्यसेवा गट-अ, गट-ब आणि गट-क संयुक्त पूर्व परीक्षा वर्षातून दोनपेक्षा अधिक वेळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला गती मिळण्याबरोबरच उमेदवारांना एका वर्षात एकापेक्षा अधिक संधी उपलब्ध होणार आहेत.
सीबीडी बेलापूर येथील आयोगाच्या मुख्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. राज्य शासनाच्या भरती प्रक्रियेतील सुधारणांनंतर आयोगामार्फत होणाऱ्या भरतीतील पदसंख्या पुढील काळात चार ते पाच पट वाढण्याची अपेक्षा आहे. सध्या आयोग दरवर्षी सुमारे सहा ते सात हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवितो. मात्र वाढत्या पदसंख्येमुळे आणि उमेदवारांच्या संख्येत होणाऱ्या वाढीमुळे विद्यमान ऑफलाइन परीक्षा पद्धतीत वेळेत भरती प्रक्रिया पूर्ण करणे आव्हानात्मक ठरणार असल्याने सीबीटीचा पर्याय स्वीकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.