मुंबई: ठाण्यातील ॲड. माधवी नाईक यांच्यासह विविध पक्षांचे दहा जण विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले. या नवनिर्वाचित सदस्यांचा विधानभवनात आज शपथविधी सोहळा पार पडला. विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या नवनिर्वाचित सदस्यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
भाजपचे ॲड. माधवी नाईक, प्रमोद जठार, सुनील कर्जतकर, संजय भेंडे, विवेक कोल्हे, प्रज्ञा सातव, शिवसेनेच्या (शिंदे) डॉ. नीलम गोऱ्हे व बच्चू कडू, शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रआणि राष्ट्रवादीचे झिशान सिद्दिकी यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार देखील उपस्थित होते.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार होती. 12 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणूक होणार होती. परंतु 10 जागांसाठी 10 उमेदवारांनीच अर्ज दाखल केल्यामुळे महाराष्ट्रातील विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. यामध्ये भाजपच्या सहा, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, राष्ट्रवादी अजित पवार गटाचा एक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या (महाविकास आघाडी) एका उमेदवाराचा समावेश आहे.
विधानसभेत पक्षीय संख्याबळ
भाजपा: 132-1=131, शिवसेना: (शिंदे गट)-57, राष्ट्रवादी (अजित पवार गट): 41-1=40, काँग्रेस-16, राष्ट्रवादी: (शरद पवार गट)-10, शिवसेना (ठाकरे गट):20, समाजवादी पार्टी:2, जनसुराज्य शक्ती:2, राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टी:1, राष्ट्रीय समाज पक्ष:1, एमआयएम:1, सीपीआय (एम):1, पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- पीडब्ल्यूपीआय:1, राजर्षी शाहू विकास आघाडी:1 (राजेंद्र यड्रावकर), अपक्ष:2 (शिवाजी पाटील आणि शरद सोनावणे, महायुती: 234, मविआ: 49
इतर: 3, एकूण: 286 आमदार