ठाणे : वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला पर्यावरणवाद्यांचा विरोध सुरु असतानाच, काही ठाणेकरांनी ऑनलाईन याचिका स्वाक्षरी मोहीम सुरु केली आहे. अवघ्या तीन दिवसांत एक हजारहून अधिक जणांनी स्वाक्षरी मोहीमेत सहभाग घेतला. येत्या काही दिवसांत ‘एक्स’ या समाजमाध्यमावरही मोहीम सुरु केली जाणार आहे.
मेट्रो चार प्रकल्प पूर्ण करा. त्यानंतरच वर्तुळाकार मेट्रोचे काम सुरु करा अशी मागणी याद्वारे करण्यात येत आहे. ठाणे शहरातील अंतर्गत मार्गावरील वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘महामेट्रो’च्या माध्यमातून वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. ठाणे शहरात मागील १० वर्षांपासून वडाळा-घाटकोपर-कासारडवली या मेट्रो चार प्रकल्पाच्या मुख्य मेट्रो मार्गिकेचे काम अद्यापही सुरु आहे. तसेच शहरात विविध विकास कामांसाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. या कामांमुळे ठाणे शहरात वाहतुक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. असे असतानाच ठाणे शहरात वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुुरु झाले आहे. ठाणे शहरातील विविध भागांत वर्तुळाकार मेट्रो कामासाठी लोखंडी पत्रे बसविण्यास सुरुवात झाली आहे.
वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाची सध्या ठाणेकरांना आवश्यकता नाही. हा प्रकल्प अयशस्वी ठरू शकतो तसेच पर्यावरणाचेही नुकसान होणार असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांकडून होत आहे. घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट भागातील रहिवाशांनी देखील या प्रकल्पामुळे वर्तुळाकार मेट्रो स्थानक परिसरात वाहतुक कोंडी वाढणार असल्याचा दावा करत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार संजय केळकर यांची भेट घेतली होती. त्यानंतर येथील रहिवासी, महामेट्रोचे अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त बैठक झाली होती.
दरम्यान, काही ठाणेकरांनी पुढे येत या प्रकल्पाविरोधात ऑनलाईन मोहीम हाती घेतली आहे. सिटीझन्स ऑफ घोडबंदर रोड या संस्थेने ई याचिका स्वाक्षरी मोहीम हाती घेतली होती. मुख्य मेट्रोचे काम पूर्ण झाल्यानंतरच वर्तुळाकार मेट्रोचे काम सुरु करा असे याचिकेत म्हटले आहे. अवघ्या तीन दिवसांत एक हजारहून अधिक जणांनी या याचिकेत स्वाक्षरी केली. येत्या काही दिवसांत ‘एक्स’ या समाजमाध्यमावरही एक मोहीम हाती घेतली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पास सध्यातरी विरोध वाढू लागला आहे.