रुग्णवाहिकेला उशीर झाल्याने रुग्णाचा मृत्यू?

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिका न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मेवालाल गुप्ता असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कल्याण स्टेशन परिसरात प्रकृती बिघडल्यानंतर १०८ नंबरवर कॉल करुन रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र रुग्णवाहिका तब्बल 40 मिनिटे उशिरा आली, तोपर्यंत रुग्णाचा मृत्यू झाला. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील दीपक हॉटेलजवळ एका अज्ञात व्यक्तीला अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. संबंधित इसमाने स्वतः १०८ आपत्कालीन सेवेला फोन करून रुग्णवाहिकेची मागणी केली. त्याची प्रकृती झपाट्याने खालावत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनीही वारंवार १०८ वर संपर्क साधला. तरीही रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यास तब्बल 40 मिनिटांचा विलंब झाला. रुग्णवाहिकेमध्ये डॉक्टरही नव्हता. विशेष म्हणजे, दीपक हॉटेल ते रुक्मिणीबाई हॉस्पिटल हे अंतर अवघे तीन मिनिटांचे असतानाही रुग्णवाहिका वेळेत न पोहोचल्याने संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

घटनेनंतर संतप्त नागरिकांनी परिसरात मोठा गोंधळ घालत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. वेळेत मदत मिळाली असती तर जीव वाचला असता, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात 108 रुग्णवाहिकेवरील डॉक्टर मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर ते केवळ 12 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झालेला होता.