प्रभाग प्रारूप आराखडा जाहीर
हरकतींसाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदत
उल्हासनगर: उल्हासनगर महापालिकेतील प्रभाग रचना निश्चित करण्याचा प्रारुप मसुदा जाहीर करण्यात आला असून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. या अधिसूचनेनुसार आता उल्हासनगरात २० प्रभागातून एकूण ७८ नगरसेवकांची निवड केली जाईल.
उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेचा महत्त्वपूर्ण प्रारुप मसुदा राज्य शासनाने ३ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचनेद्वारे जाहीर केला आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ५ (३) अन्वये ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून, तिच्या अंमलबजावणीनंतरच पुढील सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. या अधिसूचनेनुसार उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्र २० प्रभागांमध्ये विभागण्यात येणार आहे. त्यामध्ये १८ प्रभाग हे चार सदस्यीय, तर दोन प्रभाग हे तीन सदस्यीय राहतील. विशेष म्हणजे पाच सदस्यीय प्रभागांचा समावेश यावेळी करण्यात आलेला नाही. एकूण मिळून ७८ नगरसेवकांची निवड नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे.
नगरविकास विभागाच्या आदेशानुसार हा प्रारुप मसुदा नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे. नागरिकांनी आपल्या हरकती व सूचना १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत आयुक्त, उल्हासनगर महापालिका यांचेकडे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
या अधिसूचनेची अंमलबजावणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणार असून शहरातील राजकीय समीकरणे, पक्षीय रणनीती आणि स्थानिक नेतृत्वाचे गणित यात मोठ्या प्रमाणावर बदल घडविणार आहे. या अधिसूचनेने उल्हासनगरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी निवडणुकीची रंगत यामुळे अधिकच वाढणार आहे.