कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नोंदवला निषेध
कल्याण: कल्याण पश्चिमेतील गौरीपाडा मिलिंदनगर परिसरात रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसामुळे तर या रस्त्याची अक्षरशः दैना उडाली आहे. याचा निषेध म्हणून आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडून तसेच खड्ड्याभोवती रांगोळ्या टाकून कडोंमपा प्रशासनाचा निषेध केला.
या खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी न करता ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी युवा सेनेचे शहर अधिकारी गणेश नाईक यांनी केली.
कडोंमपाकडून खड्ड्यांमध्ये खडी टाकून तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र पावसात पुन्हा ही खडी बाहेर पडते आणि पुन्हा खड्डे तयार होतात. त्यामुळे वाहन चालकांना या रस्त्यावरून मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागते. कडोंमपाकडे अनेकदा या खड्ड्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मात्र, प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ठाकरे गटाने आक्रमक होत आज अनोखे आंदोलन केले.
यावेळी विभागप्रमुख सतीश वायचळ, शाखाप्रमुख विशांत कांबळे, उमेश म्हात्रे, समाजसेवक सुनील उतेकर, गणेश कांबळे, नितीन सावंत, भरत गायकवाड, विजय पवार, रवी मोरे, विराज गायकवाड, सिद्धेश दळवी महिला उपशहर संघटक राजश्री म्हात्रे, विभाग संघटक जया जाधव, शाखा संघटक सुप्रिया जाधव व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.