पाच वर्षे दुरुस्ती रखडली; म्हाडस धरणाची गळती सुरूच

परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली

मुरबाड: संततधार पावसामुळे औद्योगिक विकास महामंडळाचे म्हाडस येथील धरण ओव्हर फ्लो झाले असले तरी, सुरक्षिततेअभावी अखेरच्या घटका मोजत आहे. परिणामी परिसरातील नागरिक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत.

मुरबाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राला मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी म्हाडस येथे ४० वर्षांपूर्वी धरण बांधण्यात आले आहे. त्याची देखभाल दुरुस्ती ही औद्योगिक विकास महामंडळामार्फत केली जाते. परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्या धरणाची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नसल्याने धरण अनेक ठिकाणी पाझरत आहे. त्यामुळे धरणात मुबलक पाणीसाठा होत नाही. औद्योगिक विकास महामंडळाने 2020 साली प्रशासकीय मान्यता देऊन सुमारे चार कोटी निधी मंजूर केला. तेव्हापासून या धरणाचे काम प्रगतीपथावर असून जुलै 2025 संपत आला तरी या धरणाचे काम पूर्ण झालेले नाही.

सध्या संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे हे धरण काठोकाठ भरले असून ठेकेदाराने धरणाच्या दोन्ही बाजूला फक्त लाल दगडाची सोलिंग केली आहे. परंतु दगडामध्ये असणाऱ्या भेगा सिमेंटने भरलेल्या नसल्याने धरणातून झिरपणारे पाणी मात्र थांबलेले दिसत नाही. शिवाय मुख्य बांधावर असलेल्या रस्त्याची देखील कोणत्याही प्रकारे दुरुस्ती केलेली नाही. जर धरणाने पाण्याची पातळी ओलांडली तर सुमारे पाच कोटींची दुरुस्ती देखील पाण्यात वाहून जाण्याची शक्यता आहे. हे धरण फुटले तर परिसरातील अनेक गावात पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत आहे.

धरणाचे काम हे प्रगतीपथावर असल्याने ते ठेकेदाराने केव्हा पूर्ण करावे याची माहिती या कार्यालयाकडे उपलब्ध नाही, शिवाय औद्योगिक विकास महामंडळामार्फत होणाऱ्या कामाची गुणवत्ता चाचणी होत नसल्याने या कामाच्या दर्जाबाबतही काही सांगता येत नसल्याचे औद्योगिक विकास महामंडळाचे उप कार्यकारी अभियंता निवास पाटील यांनी सांगितले.