नवी मुंबई: सानपाडा गावातील ग्रामस्थांना तलावासाठी गावालगतच जागा आरक्षित करून देखील या ठिकाणी तलाव उभारले जात नाहीत. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने यंदा कृत्रिम तलाव उभारावे त्यानंतर कायमस्वरुपी तलाव तयार करावेत अशी मागणी सानपाडा ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने अखेर सानपाडा ग्रामस्थांनी सोमवारी स्वयंस्फूर्तीने खोदकाम करून कृत्रिम तलाव तयार केले.
मागील अनेक वर्षांपासून सानपाडा ग्रामस्थांना श्रीमूर्ती विसर्जनासाठी जीव मुठीत धरून एमआयडीसी येथील तुर्भे पोलिस स्थानकामागे असलेल्या खोडक तलावात श्रीमूर्ती विसर्जनासाठी जावे लागते. त्यामुळे सानपाडा ग्रामस्थांच्या व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या वतीने गावालगत असलेल्या रेल्वे अंडर पासजवळील जुना धारण तलाव असलेल्या ठिकाणीच नवीन तलावाच्या उभारणीची मागणी सातत्याने होत होती, तसा ठराव नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूरही झाला आहे. नवी मुंबई विकास आराखडा सादर करताना प्रशासनानेही हा भूखंड तलाव आणि मैदानासाठी आरक्षित केले आहे. तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी हा भूखंड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्यात यावा असे लेखी पत्र सिडको प्रशासनास दिले आहे. मात्र तरीही या ठिकाणी तलाव उभारणीच्या हालचाली दिसत नव्हत्या. त्यामुळे सानपाडा ग्रामस्थांनी सोमवार २३ जून रोजी स्वयंस्फूर्तीने पोकलेन लाऊन खोदकाम करत कृत्रिम तलाव तयार केले.