राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू

काँग्रेस-एमआयएमसह विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

ठाणे: विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज (दि.23) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. दरम्यान, या प्रसंगी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना, जे लोक पक्ष सोडून गेले. त्यांच्याकडे लक्ष देण्याऐवजी नवीन कार्यकर्त्यांची फौज उभारणे आणि त्यांच्यातून नेते घडविणे ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. तेच आम्ही करीत आहोत, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. या वेळेस खासदार बाळ्यामामा म्हात्रे, शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाता घाग, शमीम खान, मुफ्ती अशरफ आदी पदाधिकारी उपस्थित होते. एमआयएम, काँग्रेस या पक्षांसह इतर राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनी शरद पवार आणि डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवून हा पक्ष प्रवेश केल्याचे प्रवेशकर्त्या कार्यकर्त्यांनी सांगितले. तर डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले की, सध्या पक्षाच्या संघर्षाचा काळ आहे. या काळातही शमीम खान आणि मुफ्ती अशरफ यांच्या पुढाकारातून शेकडो कार्यकर्ते पक्षात आले आहेत. पक्षात आलेले हे कार्यकर्ते धर्मनिरपेक्ष विचारधारेवर चालणारे आहेत. सध्याच्या अस्थिर वातावरणातही राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षच न्याय करू शकतो, यावर लोकांचा विश्वास आहे, हे या पक्षप्रवेशाने सिद्ध झाले आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.

कळव्यातील पक्षफुटीबाबत विचारले असता, जे पक्ष सोडून गेले त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. कारण, नवीन कार्यकर्ते घडविणे आणि त्यातून नवनेतृत्व निर्माण करणे, हेच आमचे ध्येय आहे. शिवसेनेतील इच्छुकांची भरमार झाली आहे. ते सर्वांनाच उमेदवारीचे आश्वासन देत आहेत. जणू काही 130 चे 260 नगरसेवक ते सभागृहात नेणार आहेत. पण, इथून तिकडे गेलेल्यांना उमेदवारीचे आश्वासन दिल्याने जे जुने जाणते शिवसैनिक नाराज झाले आहेत किंवा नाही, याच्याशी आपणाला देणेघेणे नाही. कारण, दुसर्‍याच्याघरात वाकून बघण्याची आम्हाला सवय नाही. पोस्टवरून कोणाचे फोटो काढले जातात, कुणाचे फोटो टाकले जातात, हे समस्त कळवेकर पहात आहेत. त्यावर आपण भाष्य न केलेले बरे, असेही डाॅ.जितेंद्र आव्हाड म्हणाले.