दीड महिन्यांत एकही फेरीवाला नाही
ठाणे : ठाणे स्टेशन परीसर कायमस्वरूपी फेरीवालामुक्त ठेवण्यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाने आणखी एक पाऊल उचलले आहे. या भागातील पदपथ रुंद करून त्यावर रेलिंग लावण्याची योजना आखली आहे, त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील फेरीवाला मुक्त ठाणे हे महाराष्ट्रातील एकमेव स्टेशन ठरणार आहे.
मुंबई-कल्याणवरून ठाणे रेल्वे स्टेशनमध्ये दिवसाला किमान दहा ते १५ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांना सकाळ आणि संध्याकाळ कामावरून येताना आणि जाताना फेरीवाल्यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. रिक्षा चालकांची अरेरावी आणि दादागिरीचा सामना करावा लागत होता. फेरीवाला कायद्यात रेल्वे स्टेशन परिसरात १५० मिटरपर्यंत धंदा करण्यास मनाई करण्यात आली असतानाही रेल्वे पोलीस आणि महापालिका अतिक्रमण विभागातील कर्मचारी-अधिकारी यांच्याबरोबर अर्थपूर्ण संबंध ठेऊन फेरीवाले बिनधास्त धंदा करत होते. प्रवाशांना पदपथ चालण्यासाठी मिळत नव्हते. त्याबाबत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करण्याची मोहीम पोलिसांच्या मदतीने मागच्या महिन्यापासून राबविण्यास सुरुवात केली आहे, त्याला यश मिळाले आहे.
महापालिका प्रशासनाने स्टेशन भागात दोन पाळीमध्ये प्रत्येकी २० कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्या मदतीला पोलीस देखील बंदोबस्त देत आहेत, त्यामुळे या भागातून फेरीवाले गायब झाले आहेत. पादचाऱ्यांना नीट चालता यावे यासाठी या भागातील पदपथ मोठे करण्यात येणार आहेत. स्टेशनपासून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीपर्यंत असलेला पदपथ रुंद करून त्याला उंच रेलिंग लावण्यात येणार असल्याचे महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. या बदलामुळे फेरीवाले बसणार नाहीत तसेच रिक्षा चालक देखील भाडे घेण्यासाठी रांग मोडणार नाहीत असा विश्वास त्या अधिकाऱ्याने व्यक्त केला.
मध्य रेल्वेच्या कसारा-कर्जत ते थेट छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत तसेच चर्चगेट ते बोईसर या रेल्वे स्टेशन भागात ठाणे रेल्वे स्टेशन वगळता सर्व ठिकाणी फेरीवाल्यांचे साम्राज्य आहे. ठाणे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांनीच फक्त ठाणे रेल्वे स्टेशन फेरीवालामुक्त करून दाखविल्याचा दावा भाजपाचे माजी नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे.
स्टेशन परिसरातील नाईकवाडी येथे अनेक कुटुंबे राहतात. महापालिका प्रशासनाने पदपथ बंद करताना गावदेवी मैदान ते अलोक हॉटेलकडे येणार मार्ग बंद केला आहे. या भागातील नागरिकांनी त्यांच्या गाड्या कशा बाहेर काढायच्या असा प्रश्न येथील जागरूक नागरिक सुधाकर चिपळूणकर यांनी उपस्थित केला आहे. फेरीवालामुक्त परिसर केला हे चांगले आहे, परंतु रहिवाशांचा देखिल महापालिका प्रशासनाने विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.