राष्ट्रीय लोक अदालतीत ९९ कोटींच्या तडजोडी !

* २०,१९० प्रलंबित प्रकरणे निकाली

* राज्यात ठाणे जिल्हा अव्वल

ठाणे : ठाणे जिल्ह्याने राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल २०,१९० प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्याची कामगिरी केली केल्याने संपूर्ण राज्यात ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे. तर प्रलंबित प्रकरणांमध्ये तब्बल ९९ कोटी ५१ लाख ८९ हजार १२४ इतक्या रकमेची तडजोड करण्यात आली.

दाखलपूर्व २८,७९८ प्रकरणे निकाली निघाल्यामुळे २८ कोटी ५५ लाख २८,०४६ रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली आहे तसेच वैवाहिक प्रकरणांमध्ये तडजोडीच्या मोठ्या प्रकरणांत यश आल्यामुळे अनेक संसार पुन्हा जुळले आहेत, अशी माहिती ‘जिल्हा विधी सेवा प्राधिकरण’चे (ठाणे) सचिव ईश्वर सुर्यवंशी यांनी दिली.

मोटार अपघातांच्या तब्बल ४०२ प्रकरणांत तडजोड झाली आहे. त्यापैकी ठाणे मुख्यालयात ३१७ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून २६ कोटी २५ लाख ६५,५४१ नुकसान भरपाई मंजुर करण्यात आली. एमएससीपी १२२ /२०२२ या प्रकरणांमध्ये ४९ लाख ५० हजार इतक्या रकमेची तडजोड झाली आहे. एमएससीपी ५० /२०१४ या प्रकरणी ७३ लाख इतक्या रकमेची तडजोड झाली आहे. पक्षकाराला त्वरीत नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.

कल्याण तालुक्यात ५२ मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड केल्यामुळे पाच कोटी ९५ लाखांहून अधिक नुकसान भरपाई मंजुर झाली आहे शिवाय दाखलपूर्व बँक  रिकव्हरीची एकूण ३३७ प्रकरणे निकाली निघाली आहेत. ठाणे मोटार अपघात दावा न्यायाधीकरण यांच्याकडे असलेल्या पुढील प्रकरणांमध्ये मयत व्यक्तींच्या वारसांना जास्तीतजास्त मोटार अपघात भरपाई मंजुरीसाठी जिल्हा न्यायाधीश -३ पी.एस. विठलाणी, डॉ. आर.आर.तेहरा, जिल्हा न्यायाधीश ६, व जिल्हा न्यायाधीश एस.बी. कचरे यांनी पॅनर प्रमुख म्हणून विशेष प्रयत्न केले.

प्रॉपर्टी टॅक्स आणि रेव्हेन्यूची दाखलपूर्व १०,२६० प्रकरणे आणि प्रलंबित ७५४ अशी एकूण ११,०१४ प्रकरणे निघाल्यामुळे एकूण तडजोडीची रक्कम १२ कोटी ८७ लाख १७,७२५ रुपये आहे. शिवाय पाणीपट्टीची दाखलपूर्व १४,६२६ प्रकरणे निकाली निघाली असून, तडजोडीची रक्कम चार कोटी ९६ लाख ८८,५०४ रुपये आहेत.