भाजपाकडून जल्लोष
ठाणे : शुक्रवारी दुपारी ठाणे स्थानकातील फलाट क्र. ५ वर ‘वंदे भारत’ रेल्वे येताच भाजप नेते, नागरीक आणि विद्यार्थ्यांनी तिचे जोरदार स्वागत केले.
ही वेगवान गाडी पाच क्रमांकावर शिरताच चालकांनी प्रवाशांना सतर्क करण्यासाठी सतत ‘हुटर’ वाजवला. तरीदेखील फलाट क्रमांक दोन ते पाचवर असलेल्या हजारो प्रवाशांनी ‘तिला’ पाहण्यासाठी, ‘तिचे रुप’ टिपण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. अनेक प्रवासी तर रुळांत उतरुन गाडीजवळ जाण्यासाठी आणि इंजिनला फक्त स्पर्श करण्याकरीता धावल्याने रेल्वे सुरक्षा बलाने त्यांना कसेबसे रोखले. मात्र ही गाडी दुपारी ३.२० ऐवजी दीड तास उशिराने ठाण्यात पोहचल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला होता. त्यातच गाडी थांबल्यावर काही कार्यकर्ते नेत्यांसह चालकांच्या केबिनमध्ये गेल्याने त्यांना बाहेर काढण्याच्या प्रयत्नात गाडी पुढच्या प्रवासासाठी सहा मिनिटे उशिरा सुटली होती. ‘वंदे भारत’ स्थानकात शिरल्यानंतर अनेकांनी डब्यात बसण्यासाठी गाडीसोबत पळण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिका-यांनी आणि पोलिसांनी कसेबसे आवरले. गाडीत काही मिनिटे शिरण्यासाठी योग्य तो वेळ देण्यात येईल, असे त्यांना समजावून सांगितल्यावर त्यांचा जीव भांड्यात पडला.
हा प्रकार होत असताना, ‘वंदे भारत’चे ठाणे स्थानकात भाजपाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते व नटून-थाटून आलेल्या महिला कार्यकर्त्यांकडूनही स्वागत करण्यात आले. यावेळी स्वागतावेळी आमदार संजय केळकर व निरंजन डावखरे यांनी ‘वंदे भारत’च्या लोको पायलट आणि सह-लोको पायलट यांचा चालकांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांचा सत्कार केला.