कारवाईबाबत आ.संजय केळकर यांनी आयुक्तांना विचारला जाब
ठाणे : शहरात विकासकामे आणि सुशोभीकरणाच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या तिजोरीची लूट होत असल्याची तक्रार आ. संजय केळकर यांनी मागील महिन्यात करून संबंधित अधिकारी आणि ठेकदारांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. त्यावर काय कारवाई केली? याचा जाब शुक्रवारी आ. संजय केळकर यांनी थेट आयुक्तांना भेटून विचारला.
एकीकडे मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांवर कारवाई होते, मग ठाणे मनपात का नाही ? असा सवाल केल्यानंतर १० दिवसात अहवाल देण्याचे आयुक्तांनी मान्य केल्याचे आ. केळकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ठाणे शहरात विविध माध्यमांतून कोट्यवधींची विकासकामे सुरु असून अनेक कामे अर्धवट आणि दर्जाहीन असतानाही कंत्राटदारांना देयके अदा करण्यात आल्याचे पुराव्यानिशी १० जानेवारी रोजी आ. संजय केळकर यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना भेटून केला होता. त्यात स्मार्ट सिटीतील अनेक कामांसह ठाणे पूर्व कोपरी येथे एक कोटी खर्चून जॉगिंग ट्रॅक बनवला. शहरातील पदपथांच्या कामात ठेकेदारांनी केलेली लूट आणि २६ तलावांच्या दुरुस्ती आणि सुशोभिकरणासाठी १८६ कोटींची तरतूद आदी संदर्भातील पुरावे आ.केळकर यांनी आयुक्तांना सादर केले होते. याचा आढावा घेण्यासाठी आ. केळकर यांनी शुक्रवारी आयुक्तांची भेट घेतली.
सर्वप्रथम ठाणे रेल्वे स्टेशन परिसर फेरीवालामुक्त केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन करून फेरीवालामुक्त परिसराची मर्यादा १५० मीटरऐवजी २०० मीटरपर्यंत करण्याची सूचना केली.
महापालिकेला विविध स्त्रोतातून मिळणाऱ्या कोट्यवधींच्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे व्हावा, याबाबत पुरावे दिलेल्या प्रकरणांवर काय कारवाई केली? असा सवाल करून जर मुंबई महापालिकेत अधिकाऱ्यांवर कारवाई होऊ शकते तर ठाणे मनपात का नाही? करोडोंची लूटमार झालेली आहे. केवळ ठेकेदारांवर कारवाई न करता अधिकाऱ्यांवरही कारवाई व्हायला हवी. येत्या विधिमंडळ अधिवेशनापूर्वी केलेल्या कारवाईची माहिती द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर आयुक्तांनी १० दिवसांत यावर कार्यवाही करणार असल्याची ग्वाही दिल्याचे आ. केळकर यांनी सांगितले. दरम्यान, ठाणे स्थानक परिसरात रिक्षाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होणारा त्रास, रिक्षा चालकांची वाढती अरेरावी यावर तोडगा काढण्यासाठी रिक्षा संघटनांसोबत संयुक्त बैठक घेणार असल्याचे आ.केळकर यांनी सांगितले.
ठाणे शहरात सुरु असलेल्या अनधिकृत बांधकामांविषयी आ.संजय केळकर यांना विचारले असता त्यांनी,अनधिकृत बांधकामांबाबत प्रशासनाकडे वारंवार पेन ड्राइव्ह तसेच अन्य माध्यमातून तक्रारी केल्याचे सांगितले. पूर्वीची बेकायदा बांधकामे बाजुलाच राहीली, आजही अशी बांधकामे सुरु आहेत. आपण शहर स्मार्ट करण्यासाठी रंगरंगोटी करत आहोत आणि हे भुमाफीया शहर विद्रुपीकरण करत आहेत. तेव्हा, नागरीकांनी प्रत्येक वेळी कोर्टाची पायरी चढावी का? असा सवाल करून ठोस कारवाई करा अन्यथा, पुढील काळात विधिमंडळात तसेच लोकशाहीतील सर्व आयुधांचा सनदशीर मार्गाने वापर करण्याचा इशारा श्री.केळकर यांनी दिला.