प्रेम संबंधातून हत्या; आरोपींना २४ तासात अटक

कल्याण : कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात 7 जानेवारी रोजी सायंकाळी 19 वर्षीय आदित्य सुरेशवर याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या प्रेम संबंधातून झाली होती. यातील आरोपी ललित उज्जैनकर, सागर, रोहित आणि नकुल यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आदित्य याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्याच तरुणीचे यापूर्वी ललित सोबत प्रेमसंबंध होते. मात्र प्रेयसीने त्याला सोडल्याच्या रागातून ललितने त्याच्या मित्रांसोबत धारधार शस्त्राने हत्या केली. यात चार जणांविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी नकुल याला तत्काळ कोळसेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक सुनील गवळी तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बोचरे,सहायक पोलिस निरीक्षक पगारे, पोलीस हवालदार हनुमंत शिर्के प्रमोद जाधव सचिन कदम मिलिंद बोरसे यांनी तीन आरोपींना मध्य प्रदेशमधील बुराहानपुर नेपानगर येथून ताब्यात घेतले.

या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी दिली.