गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय

मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची भरती प्रक्रियेला गती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीस उपस्थित होते.

मंत्रिमंडळात घेतलेल्या निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे. दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्यात येणार आहे. अनुसूचित जमातीची रिक्त पदे तत्काळ भरण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग फास्ट ट्रॅकवर असून राज्य शासनाची ४५२ कोटी ४६ लाख रुपये आर्थिक सहभाग देण्यास मान्यता मिळाली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतील भाडेपट्टयाच्या दस्तांना १ हजार रुपये इतके कमी मुद्रांक शुल्क आकारले जाणार आहेत. याचा फायदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गट लाभार्थ्याना होणार आहे. गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविण्यात येणार असून राज्यातील २३८६ गावांमध्ये बीएसएनएलला मनोरे उभारण्यासाठी २०० चौ.मी. जागा मोफत देण्यात येणार आहे.

अमरावती जिल्ह्यातील वासनी मध्यम प्रकल्पाच्या ८२६ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली आहे. याचा लाभ ४३१७ हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील कोरडीनाला प्रकल्पाच्या १६९.१४ कोटी खर्चास सुधारित मान्यता देण्यात आली असून ३६५९ हेक्टर जमिनीस सिंचनाचा लाभ होणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना २००६ ते २००८  या वर्षातील अत्युत्कृष्ट कामासाठीच्या आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना ७ व्या वेतन आयोगानुसार वेतनाची थकबाकी देण्याबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आली आहे.