डोंबिवली : राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मशिदीवरील भोंग्याबाबत दिलेले अल्टीमेटम आणि मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान याची दखल म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातून आमदार तथा मनसे नेते प्रमोद (राजू) पाटील यासह ६८ मनसैनिकांना फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ४ मे पासून मशिदीवरील भोंगे काढुन टाकणेबाबत चेतावणी दिली आहे. तसे न केल्यास अजानच्या वेळी मशिदीसमोर लाउडस्पीकर लावुन हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन केले होते. याबाबत कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागु केला आहे. सदर मनाई आदेशामध्ये पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांनी एकत्र जमणे, जाहीरसभा घेणे, मिरवणुका काढणे, घोषणा, प्रतिघोषणा देणे इत्यादी कृत्यांना मनाई केली आहे. पोलीस उप आयुक्त विशेष शाखा ठाणे यांनी २८ एप्रिल अन्वये फौजदारी प्रक्रीया संहिता १९७३चे कलम १४४ नुसार २९ एप्रिल सकाळपासुन ते २७ जून पर्यंत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाने मनाई आदेश लागु केला आहे. मानई आदेशात कोणत्याही धार्मिक स्थळापासुन २०० मीटर परिसरात सार्वजनिक रितीने बेकायदेशिर जमाव करणे, घोषणावाजी करणे, गायन करणे, वाद्य वाजविणे, विनापरवाना ध्वनीक्षेपकाचा वापर करणे, रॅली, मिरवणुक तसेच सभा घेणे यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते असल्याने अप्रत्यक्ष विना परवानगी एकत्र जमुन व गर्दी हाईल असे कार्यक्रमाचे आयेजन करू नये तयेच कोणत्याही धर्माच्या, जातीच्या अथवा व्यक्तीच्या भावना दुखवतील असे कोणतेही कृत्य करू नये ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे नोटीस मध्ये नमूद केले आहे. डोंबिबली शहरातील विविध पोलीस ठाण्यातुन डोंबिवलीतील मनसैनिक व इतर पदाधिकाऱ्यांनाही पोलिसांनी नोटीस बाजावल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त जय मोरे यांनी दिली.