कल्याण : आखाती देशात हायजॅक झालेल्या जहाजावर अडकलेल्या कल्याणकराची सुटका करण्यात आली असून हा तरुण कल्याणमधील आपल्या घरी सुखरूप पोहोचला आहे.
कल्याणच्या गोविंदवाडी परिसरात राहणारा मोहम्मद मुन्नवर हा आखाती देशातील खालीद फरज या शिपींग कंपनीच्या मालवाहू जहाजावर डॅक केडर पदावर कार्यरत होता. येमेनचे सौदी आणि संयुक्त अमिरात यांच्यासोबत संघर्ष आहे. या संघर्षात हौसी यांनी खालीद फरज या शिपींग कंपनीचे मालवाहू जहाज हायजॅक केले. या जहाजावर मुन्नवर कार्यरत असल्याने त्याची आई बेनजीर आणि बहिण अलीजा यांची चिंता वाढली होती. मुन्नवरचे काय होणार या चिंतेने त्यांना दिवसरात्र झोप नव्हती. मात्र भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर हायजॅक करण्यात आलेल्या जहाजावरील मुन्नवरच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु झाले.
मुन्नवर हा जहाजावरुन सूटन कल्याणच्या घरी सुखरुप परता आहे. मुन्नवर याच्यासह त्याच्या आईने मोदी सरकारचे आभार मानले आहेत. मुन्नवर याच्याकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की, जहाज हायजॅक झाल्यावर आम्ही भयभीत झालो होतो. आमचे पुढे काय होणार जगणार की नाही याची काही एक शाश्वती नव्हती. त्या ठिकाणी जहाजावरील एका खोलीत आम्हाला कोंडून ठेवले होते. जेवण दिले जात होते. मात्र आम्ही नजर कैदेत होतो. 12 दिवसांनी आम्हाला बाहेर फेरफेटका मारण्यासाठी काढले जात होते. पुन्हा बंद खोलीत नजरकैदेत ठेवले जात होते. माझ्या आई व बहिणाने भारतीय दूतावासाशी संपर्क साधल्यावर फोनाफोनी सुरु झाली. चर्चा सुरु झाली. तेव्हा कुठे तिथून सुटका होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या. आमची सुटका झाल्याने मी घरी सुखरुप परतलो. मी आाल्याचा आनंद इतका होता की तो गगऩात मावणारा नव्हता. घरी ईदच साजरी झाली.
आत्ता पुन्हा आखाती देशात कामानिमित्त जाणार का असा सवाल मुन्नवरला विचारला असता त्याने इससे ज्यादा बुरा क्या होगा असे सांगत दुसऱ्या कंपनीत जॉब मिळाला तर नक्कीच जाणार. अशा कठीण प्रसंगात आपले मनोधैर्य ढळू देऊ नये. दूतावासाशी संपर्क साधावा हे यातून शिकायला मिळाल्याचे त्याने सांगितले.