काल रात्री माटूंगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या रेल्वे अपघातामुळे रेल्वे रुळ, बाजुला असलेले खांब यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तेव्हा अपघातग्रस्त डबे बाजुला काढून ट्रॅकवरुन सुरक्षित ठिकाणी नेणे, रेल्वे ट्रॅक दुरुस्त करणे, ओव्हरहेड वायर यंत्रणा पुर्ववत करणे हे मोठे आव्हान रेल्वे समोर होते.
पहाटे अपघातग्रस्त डबे सुरक्षित ठिकाणी नेत सकाळी दादरकडे जाणारा जलदगती मार्ग वाहतुकीकरता सुरु करण्यात आला. असं असलं तरी दादरहून कुर्ला दिशेने जाणारा जलदगती मार्ग हा रेल्वे वाहतुकीकरता बंद होता. यामुळे भायखळा – दादर दरम्यान जलद लोकल या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या होत्या. अपघातग्रस्त भागात काम सुरु असल्याने लोकलच्या वेगावरही मर्यादा ठेवाव्या लागल्या होत्या.
या सर्वांमुळे सकाळी ऐन गर्दीच्या वेळी लोकल वेळापत्रक पुर्णपणे कोलमडले होते. लोकल गाड्या या अर्ध्या तासापेक्षा जास्त उशीराने धावत होत्या. यामुळे ठाणे – कल्याण – बदलापूर- टिटवाळा दरम्यान रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली होती, लोकल पकडणे हे अशक्य झाले होते. यामुळे ठाणे – मुंबई प्रवास करतांना रस्ते मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन स्वतः मध्य रेल्वेने केले होते. ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु असल्याने अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्या या रद्द केल्या , काहींची सेवा ही मुंबईबाहेरच समाप्त करण्यात आली होती.
अखेर सव्वा वाजण्याच्या सुमारास दादरहून कुर्लाकडे जाणारा जलद मार्ग हा वाहतुकीसाठी सुरु करण्यात आला असल्याचं रेल्वेने जाहीर केले. मुंबई- चैन्नई गाडी या मार्गावरुन पहिल्यांदा रवाना करण्यात आली. आता अपघातग्रस्त जागेवरुन रेल्वे वाहतुक सुरु झाली असली तरी संध्याकाळी गर्दीची वेळ येईपर्यंत लोकल सेवेचे वेळापत्रक हे सुरळीत झालेले असेल अशी अपेक्षा आहे.