उल्हासनगर : स्थानिक कॅम्प क्रमांक 5 येथील खदान परिसरात असलेल्या महापालिकेच्य डम्पिंग ग्राऊंडला शुक्रवारी रात्री अचानक आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या व पथकाने धाव घेऊन आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काल शनिवारी दुपारी आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र डम्पिंगमधून निघणाऱ्या आगीमुळे आणि धुरामुळे कॅम्पसमधील रहिवाशांना त्रासाला सामोरे जावे लागले.
सदर डम्पिंग ग्राऊंड निर्माण झाल्यापासून परिसरातील नागरिकांची अडचण झाली आहे. हे डम्पिंग बंद करण्याच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी आणि महापालिकेचे लोकप्रतिनिधी यांनी आपापल्या स्तरावर आंदोलने केली आहेत. रात्री उशिरापर्यंत भीषण आग आणि त्यातून निघणारा विषारी धूर दोन किलोमीटरपर्यंत पसरला होता. विशेषत: उल्हासनगर कॅम्प 5 मध्ये अनेक मंदिरे, आश्रम आहेत, ज्यामध्ये दररोज शेकडो भाविक येत असतात, त्यांनाही या विषारी धुराचा त्रास सहन करावा लागत होता.
तीन वर्षांपूर्वी उल्हासनगरचे सामाजिक कार्यकर्ते राजकुमार कुकरेजा आणि राजेश चांगलानी यांनी एनजीटीमध्ये अपील केले होते. उल्हासनगर पालिकेला एनजीटीने नोटीस पाठवून दोन महिन्यांत डम्पिंग ग्राउंड हटवण्याचा विचार करण्यास सांगितले होते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या बेकायदा डम्पिंग ग्राऊंडवर आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांच्या निविदा निघाल्या आहेत, मात्र असे करूनही समस्या जैसे थे च आहे. अंबरनाथ तालुक्यातील उसटाणे गावात घनकचरा प्रक्रिया प्रकल्प होणार असल्याचेही सांगण्यात आले, मात्र त्यालाही एक वर्ष झाले.
प्रस्तावित जमिनीवर थेट कोणतेही काम सुरू न झाल्याने सदर डम्पिंग ग्राऊंड उसटाणे गावात स्थलांतरित करण्यास अद्याप वेळ आहे. जनतेच्या आरोग्याशी पालिका खेळत आहे. नागरिकांच्या हितासाठी मी कायदेशीर लढाई लढत असून, जोपर्यंत समस्या सुटत नाही, तोपर्यंत हा विषय मांडत राहणार आहे, असे याचिकाकर्ते राजकुमार कुकरेजा यांनी सांगितले.