अग्निशस्त्र बाळगणाऱ्या ७२ आरोपींना अटक

भाईंदर: मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये २०१९ सालापासून अवैध अग्निशस्त्र बाळगणे व विक्री प्रकरणी ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाया गेल्या चार वर्षांत करण्यात आल्या असून या प्रकरणी ७२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलिस ठाणे कार्यक्षेत्रामध्ये अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्यावर २०१९ मध्ये १६ गुन्हे दाखल असून ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे तर त्यांच्याकडून देशी कट्टे ११, पिस्टल ७, बोअर पिस्तूल १, काडतूस ४१ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२० साली ३ गुन्हे दाखल असून ४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टे २, बनावट ९ एम एम पिस्टल १ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२१ मध्ये १५ गुन्हे दाखल असून ३२ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून गावठी कट्टे १५, पिस्टल १, बारा बोअर १, काडतुसे २५ असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०२२ मध्ये १ गुन्हा दाखल असून १ आरोपीला अटक करून २४ काडतुस जमा करण्यात आलेली आहेत, तर १ जानेवारी २०२३ ते ३० मार्च २०२३ या तीन महिन्यामध्ये ५ गुन्हे दाखल असून ७ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तुल, गावठी कट्टा, देशी पिस्तूल व १० जिवंत काडतूसे जमा केली आहेत.