जिल्ह्यात २५,९७६ असाक्षर परिक्षार्थींनी दिली परीक्षा

ठाणे : केंद्र शासन पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून ठाणे जिल्ह्यात २५,९७६ असाक्षर परिक्षार्थींनी परीक्षा दिली.

ठाणे जिल्ह्यातील १५ वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (वाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसीत करून त्या व्यक्तींमध्ये महत्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसीत करण्याच्या दृष्टीने नोंदणी झालेल्या असाक्षरांची सन २०२४-२५ मधील पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार, २३ मार्च, २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्रशासनाच्या निर्देशानुसार परीक्षा घेण्यात आली. ठाणे जिल्ह्यात परीक्षा केंद्रांची संख्या २,३६५ होती. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी ( (एफएलएनएटी) परिक्षेस बसलेले असाक्षर महिला २०,२१९ तर पुरुष ५७५७ असे एकूण २५,९७६ असाक्षर परिक्षार्थींनी परीक्षा दिली आहे.

या परिक्षेत आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरूकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण, इ. बाबींचा समावेश होता. स्थानिक रोजगार, पुनर्कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करण्याच्या दृष्टीकोनातून प्रौढ नव-साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील 15 वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसीत करता येतील, त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात 25,976 असाक्षर परिक्षार्थींनी परीक्षा दिली, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी दिली.

यावेळी परीक्षा केंद्रावर परिक्षेकरिता उपस्थित झालेल्या परिक्षार्थींना ओवाळून, गुलाबपुष्प व गोड खाऊ देऊन, सुंदर रांगोळी रेखाटून स्वागत करण्यात आले. सर्व परीक्षा केंद्रांवर आनंददायी व उत्साही वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षा कामकाजाची पहाणी करणेसाठी केंद्र शासनातर्फे गगनकुमार कामत यांची ठाणे जिल्ह्यासाठी निरीक्षक म्हणून विशेष नियुक्ती करण्यात आली होती.

ठाणे जिल्हा नियामक परिषदेचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे व जिल्हा कार्यकारी समितीचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षेचे नियोजन करण्यात आले होते.

परिक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे परिक्षेची वेळ सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लवचिक ठेवण्यात आली होती. प्रत्यक्ष पेपरचा कालावधी तीन तासांचा होता. दिव्यांग व्यक्तींसाठी 30 मिनिटे जादा वेळ देण्यात आला. ठाणे जिल्ह्यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, तेलगू, तमिळ, गुजराती आणि कन्नड अशा आठ माध्यमातून परीक्षा देण्यात आली.

परीक्षेवेळी प्रौढ परीक्षार्थींना उत्साह व आत्मविश्वास अनुभवास आला. विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, देवळोली, केंद्र कान्होर, तालुका अंबरनाथ येथील ७२ वर्षांच्या आजीबाईंनी मनोगतातून आपल्या या वयातील शिकण्याचा व परीक्षेबद्दलचा आनंदही व्यक्त केला.