कुंडमळ्याजवळ चौघांचा मृत्यू, ३८ जण वाचले
पुणे : रविवार पुण्याच्या मावळमधील कुंडमळ्याजवळ पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी घातवार ठरला. कुंडमळ्याजवळील इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळला आणि या दुर्घटनेत चार पर्यटकांचा मृत्यू झाला. बचाव कार्य सुरू असून रात्री उशिरापर्यंत एकूण 38 जणांना वाचवण्यात यश आले.
रविवारी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास ही पूल दुर्घटना घडली. या पुलाखाली एक लहान मुलगा अडकला होता. त्याचाही मृत्यू झाला. तसेच या दुर्घटनेमध्ये अजूनही 20 ते 25 जण वाहून गेल्याची माहिती आहे.
कोसळलेला पूल हा सुमारे 33 वर्षे जुना असून तो गंजलेल्या अवस्थेत होता. त्यावरून दोन चाकी गाड्याही जात असल्याची माहिती आहे. अशात रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पर्यंटकांनी कुंडमाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी केली. ज्यावेळी इंद्रायणी नदीवरील हा पूल कोसळला त्यावेळी पुलावर 100 पर्यटक असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची आकडेवारी अजून वाढण्याची शक्यता आहे.
एनडीआरएफच्या जवानांनी हा पूल मधोमध कट केला असून क्रेनच्या सहाय्याने तो पूल उचलला जात आहे. या पुलाखाली एक मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढण्यात आलं आहे. आणखी एक व्यक्ती पुलाच्या खाली दबला असून त्यालाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान, या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत राज्य सरकारकडून केली जाणार आहे. तर या घटनेत जखमी झालेल्यांचा उपचाराचा खर्चही सरकारकडून केला जाणार आहे.
इंद्रायणी नदीवरचा लोखंडी पूल गंजलेला होता, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. या दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असंही अजित पवार म्हणाले.
कुंडंमाळा येथे झालेली घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राज्यातील सगळ्या नदीवरच्या पुलाचं स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्याही सूचनाही त्यांनी दिल्या.
कुंडमळा हे ठिकाण प्रसिद्ध पर्यटनस्थळ असून हे ठिकाण धोकादायक असल्याचं सांगितले जात आहे. पावसाळ्यात, विशेषतः शनिवार आणि रविवारी या ठिकाणी पर्यंटक मोठी गर्दी करतात. या ठिकाणी नदीवर जुना पूल आहे. त्याचीही डागडूजी करण्यात आली नाही. असे असले तरी प्रशासनाने त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
पुणे परिसरात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याचा प्रवाहही मोठा आहे. असे असूनही पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.