१९,५१८अर्जदारांना मिळाले सिडकोचे पसंतीचे घर

नवी मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एका क्लिकवर 19,518 अर्जदारांचे हक्काच्या आणि पसंतीच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले. यावेळी श्री.शिंदे यांनी उपलब्ध सुविधा आणि नियोजित प्रकल्पांचा ऊहापोह करत समाजातील सर्व घटकांना सिडकोची घरे मिळवून देणार असल्याचा मनोदय व्यक्त केला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिडकोच्या ‘माझ्या पसंतीचे सिडको घर’ या लॉटरीची ऑनलाईन सोडत काढण्यात आली. या कार्यक्रम प्रसंगी विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, शान्तनु गोयल, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, डॉ. राजा दयानिधी, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, गणेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, मंगेश चितळे, आयुक्त, पनवेल महानगरपालिका यांसह सिडकोतील विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी व्हिडिओद्वारे दिलेला संदेश प्रसारित करण्यात आला. आपल्या संदेशामध्ये श्री. फडणविस यांनी सिडकोची गृहनिर्माण योजना हे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारणारे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले व यशस्वी अर्जदारांना शुभेच्छा दिल्या. तसेच नवी मुंबई हे भविष्यातील विकासाचे केंद्र असून सिडकोच्या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबांना नवी मुंबईमध्ये हक्काचे घर मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी या संदेशाद्वारे सांगितले.

अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र यांनी महासोडत कार्यक्रमासाठी दिलेल्या संदेशाचे या वेळी वाचन करण्यात आले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, सिडकोच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वांत मोठी लॉटरी असून यात नागरिकांना आपली पसंत नोंदविण्याची मुभा फक्त सिडकोने दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे देण्याची घोषणा केली असून एवढ्या मोठ्या प्रमाणात घरे देण्याचा विक्रम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. सिडकोची ही घरे टाटा, एल.एण्ड टी., शापूरजी यांच्या सहभागाने बांधली असल्याने तो अतिशय दर्जेदार असून घरे रेल्वे स्टेशन्स, विमानतळाच्या जवळ असल्याने सामान्यांना त्याचा फायदा होणार आहे. नवी मुंबईचे अतिशय वेगाने शहरीकरण होत असल्याने घरांची मागणी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्वी नवी मुंबईतून मुंबईत येण्यासाठी एक ते दीड तास लागत असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री म्हणाले की, आता अटलसेतूमुळे २० मिनिटात प्रवास होतो. आता ठाणे ते विमानतळ एक डेडीकेटेड कॉरिडोर करण्यात येणार असून त्याचबरोबर मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या अर्थसंकल्पात देशात तीन कोटी घरे देण्याचे जाहिर केले असल्याने महाराष्ट्रात २० ते २५ लाख घरे नक्की बांधली जाणार असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतून बाहेर गेलेल्या मुंबईकरांना मुंबईत परत आणण्यासाठी गृहनिर्माणाच्या नवनवीन योजना आणल्या जात आहे. त्याचबरोबर सिडको, एमएमआरडीएम, एमएसआरडीसी, महाप्रित, बीएमसी, म्हाडा, एसआरए या सर्व संस्थांना एकत्र करून रखडलेले प्रकल्प लवकर सुरू करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहिर केले. समुह विकास माध्यमातून सर्वांना खुली जागा, खेळाची मैदाने, शाळा, वैद्यकीय सुविधा मिळणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.

एमटीएचएल प्रकल्पाबाबत बोलतांना उपमुख्यमंत्री म्हणाले की, काही एनजीओ, पर्यावरणवाद्यांनी या प्रकल्पास विरोध दर्शवून या प्रकल्पामुळे फ्लेमिंगो पक्षी नवी मुंबईतून कमी होतील, असे सांगितले होते. मात्र त्यावेळी रिमुव्हर्स सर्कुलेशन ड्रेन, नॉईस बॅरिअर या तंत्रज्ञानांचा वापर केल्यामुळे एमटीएचएल प्रकल्पामुळे फ्लेमिंगोची संख्या कमी न होता आणखी वाढलो. यावरून हे शासन प्रो इन्व्हायरमेंट प्रकल्प करते आहे. हे दिसून आले. आता नवीन गृहनिर्माण धोरण आणली जात असून यात सर्वांसाठी परवडणारी घरे, परवडणारी भाड्याची घरे, विद्यार्थी वसतीगृहे, काम करणाऱ्या महिलांसाठी घरे, ज्येष्ठ नागरिकांना घरे, गिरणी कामगार, डबेवाले आदीचा यात अंतर्भाव असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.