जिल्ह्यात आरटीईअंतर्गत दोन दिवसांत १,३६६ अर्ज

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील २,६१६ शाळा आरटीईसाठी निवडण्यात आल्या आहेत. त्यानुसार दोन दिवसांत १,३६६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.

बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत वंचित, दुर्बल घटकांतील मुलांसाठी अनुदानित आणि विना अनुदानित शाळांमध्ये २५ टक्के ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०१६-१७पासून ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ठाणे जिल्हा प्राथमिक शिक्षण विभागाकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येते. परंतु, यंदाच्या वर्षीपासून आरटीई कायद्यात बदल करण्यात आले. या कायद्यात बदल होत असल्यामुळे ही प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यास विलंब होत होता. एप्रिल महिना उजाडला तरी, आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली नव्हती. त्यामुळे पालक देखील चिंतेत होते. परंतु, आता पालकांची ही चिंता मिटली आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असून ३० एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांना आरटीईच्या संकेत स्थळावर अर्ज करता येणार आहे.

जिल्ह्यातून यंदा शैक्षणिक वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी २,६१६ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत प्रवेश घेता येणार आहे. या शाळांमध्ये ३६,८२८ जागा या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. या जागांसाठी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी १६ ते ३० एप्रिल या कालावधीपर्यंत पालकांना आरटीईच्या संकेत स्थळावर अर्ज करता येणार असून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार दोन दिवसात १,३६६ अर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली.