राज्यात ५४.८५ टक्के मतदान
नागपूर: जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या ‘उत्सवा’ला आज, शुक्रवारी सुरुवात झाली. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. नक्षलग्रस्त भागात सर्वाधिक नागरिकांनी हक्क बजावला असून राज्यात ५४.८५ टक्के मतदान झाले.
बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार होते. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली होती. १८ लाख कर्मचाऱ्यांनी मतदानप्रक्रियेचा कारभार सांभाळला.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात मतदान झाले.
पूर्व विदर्भात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या पाच मतदारसंघाचा समावेश होतो. पूर्व विदर्भ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ च्या निवडणुकीत पाच पैकी चार जागा भाजप-सेना युतीने तर एक जागा काँग्रेसने जिंकली होती.
२०२४ मध्ये चित्र वेगळे आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वनमंत्री सुधीर मुनंगटीवार हे रिणांगणात आहेत. पाचही ठिकाणी थेट लढत असून जेव्हा -जेव्हा थेट लढत होते त्याचा फटका सत्ताधाऱ्यांना बसतो असा आजवरचा अनुभव आहे.
नागपूर मतदारसंघात महायुतीचे नितीन गडकरी विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास ठाकरे,
रामटेक मतदारसंघात महायुतीचे राजू पारवे विरुद्ध महाविकास आघाडीचे शामकुमार बर्वे, चंद्रपूर-वणी-आर्णी मतदारसंघात महायुतीचे सुधीर मुनगंटीवार विरुद्ध महाविकास आघाडीचे प्रतिमा धानोरकर, भंडारा-गोंदिया मतदारसंघात
महायुतीचे सुनील मेंढे विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ.प्रशांत पडोळे आणि गडचिरोली-चिमूर मतदारसंघात महायुतीचे अशोक नेते विरुद्ध महाविकास आघाडीचे नामदेव किरसान यांची लढत आहे.