ठाणे: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या म्हणजेच सोमवारी जाहीर होणार आहे. ठाणे जिल्ह्यातून एक लाख २१,२४४ विद्यार्थ्यांनी बारावीची परिक्षा दिली होती. १९७ परिक्षा केंद्रावर ही परिक्षा पार पडली होती.
ही परिक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी जिल्हास्तरावर चार भरारी पथक तैनात करण्यात आले होते. आता, उद्या जिल्ह्यातील किती विद्यार्थी या परिक्षेत उत्तीर्ण होतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या वर्षी म्हणजेच सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षात ठाणे जिल्ह्यातून बारावीच्या परिक्षेत ९२. ०८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यात, मुलींनी बाजी मारली होती. त्यामुळे २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील किती टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होतायत आणि यंदाही मुलीच बाजी मारतायतं की, मुले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात बारावीच्या परिक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाख २१,२४४ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. यंदा जिल्ह्यात एकही अतिसंवेदनशील किंवा संवेदनशील परीक्षा केंद्र नव्हते.
भरारी पथकामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, उपशिक्षणाधिकारी, तज्ज्ञ शिक्षक, प्राध्यापक आणि मुख्याध्यापक यांच्या पथकाचा समावेश होता. तसेच महिला विशेष पथकाचा देखील समावेश असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे बारावीची परिक्षा कॉपीमुक्त करण्यात ठाणे जिल्हा शिक्षण विभागाला यश आले होते.