मुंबईकडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात १०टक्के कपात

ठाणे: बृहन्मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्याने १५ मेपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे महानगरपालिका हद्दीतील ज्या-ज्या भागात पाणी पुरवठा होतो, त्या ठिकाणी १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेकडून नौपाडा-कोपरी प्रभाग समिती हद्दीत हाजुरी, लुईसवाडी, नामदेववाडी, आनंदनगर, गावदेवी जलकुंभ, टेंभी बंगला जलकुंभ, कोपरी धोबीघाट, कन्हैया नगर जलकुंभ, कोपरी, नौपाडा, पाचपाखाडी, लोकमान्य सावरकरनगर प्रभाग समिती हद्दीत साईनाथ नगर, रामचंद्र नगर, जिजामाता नगर, ज्ञानेश्वर नगर, करवालो नगर, इंदिरानगर, वागळे प्रभाग समिती हद्दीत किसननगर १ व २, शिवाजीनगर, पडवळनगर, भटवाडी, अंबिका नगर,ल आणि माजीवाडा-मानपाडा प्रभाग समिती हद्दीत बाळकुम पाडा १ व २, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, गांधीनगर या भागात पाणीपुरवठा करण्यात येतो.

या परिसरात दैनंदिन 10 टक्के पाणी कपात पुढील आदेश प्राप्त होईपर्यत लागू राहणार असून नागरिकांनी पाणी जपून वापरून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे. जलाशयांतील पाणीसाठा अधिकाधिक काळासाठी उपयोगात यावा या दृष्टीने खबरदारीचा उपाय तसेच भारतीय हवामान मान्सून विभागाने यंदा एल-निनो आणि आयओडी परिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ही उपाययोजना करण्यात येत आहे.