जिल्हा
कळवा आणि विटावा खाडी बुजवण्याची भूमाफियांची स्पर्धा
कळवा आणि विटावा खाडी बुजवण्याची भूमाफियांची स्पर्धा
फोटो: ठाणे वैभव
प्रभाग समितीचे दुर्लक्ष, आयुक्तांचे मौन
सुरेश सोंडकर/ठाणे
एकीकडे मोठ मोठे प्रकल्प आणि आधुनिक सेवा सुविधांचे जाळे उभारण्याचे शर्थीचे प्रयत्न राज्य शासनामार्फत ठाणे शहरात होत असताना दुसरीकडे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे कळवा आणि विटावा खाडी अर्धी अधिक बुजवून बेकायदा चाळी आणि इमारतींचे बांधकाम जोमात सुरू आहे.
राज्य शासन ठाणे शहरात विकास कामांसाठी शेकडो कोटींचा निधी देत असून त्यास प्रतिकूल भूमिका कळवा, खारीगाव आणि विटावा भागात पाहायला मिळत आहे. खारीगाव आणि कळवा भागात अनधिकृत इमारतींचे मोठ्या प्रमाणात काम सुरू असून भर पावसात होत असलेल्या बांधकामांमुळे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत आहे. परिणामी भविष्यात एखादी घटना घडून मोठी जीवितहानीची शक्यता आहे.
विटावा भागात तर खाडी बुजवण्याची स्पर्धाच सुरू झाली असून अनधिकृत चाळींनी खारफुटीसह खाडी जवळपास उद्ध्वस्त झाली आहे. पर्यावरणाची प्रचंड हानी होत असताना कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कळवा पुलाच्या अलिकडे खाडीत झोपड्यांचा जणू पुलच बांधला जात असल्याचे छायाचित्रावरून दिसत आहे. संबंधित प्रभाग समितीने डोळे झाकले आहेत का, असा संतप्त प्रश्न विचारला जात आहे.
आयुक्तांनी या आधी काही सहायक आयुक्तांवर कारवाई केली तर काहींच्या बदल्या केल्या. पण सर्वाधिक बेकायदा चाळी आणि इमारतींचे बांधकाम सुरू असलेल्या कळवा प्रभागातील सहायक आयुक्तांची बदली केली नसल्याने त्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
300x450
300x600